मुंबई : महाविकास आघाडीला सरकार स्थापन करून आता १०० दिवस पूर्ण झाले. यादरम्यान या 'तीन चाकी सरकार'मध्ये ताळमेळ नसल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. एल्गार प्रकरणामध्ये तिन्ही पक्षाची वेगवेगळी मते समोर आली. त्यानंतर नागरिकत्व सुधारणा कायद्यावरही महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळी मते दिसून आली. आता मुस्लिम आरक्षणावरदेखील मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या एका पत्रकारपरिषदेमध्ये एक विधान केले. यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ नसल्याचे समोर आले आहे.
मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना मुस्लिम बद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अद्याप हा विषय अधिकृतपणे आपल्याकडे आला नसल्याचा दावा केला. परंतु, आठवड्याभरापूर्वी अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले होते. या संदर्भातील विधेयक लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडले जाणार असून या संदर्भात अध्यादेशही काढला जाणार आहे, असेदेखील त्यांनी ठामपणे सांगितले होते. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचे अधोरेखित झाले आहे.