नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी संध्याकाळी बुधवारपासून २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाउन असेल अशी घोषणा केली. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत सर्वांनी घरातच बसावे असे आवाहन मोदींनी केले आहे. कोरोनाची संक्रमण श्रृंखला तोडण्यासाठी हा २१ दिवसांच्या लॉकडाउनचा निर्णय घेण्यात येत असल्याचेही मोदींनी स्पष्ट केले.
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या आकडेवारीनुसार, लॉकडाउनचा निर्णय घेतल्यानंतर कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येचा वेग मंदावल्याचे आशादायी चित्र आहे. बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या मंगळवारच्या तुलनेत ५७ ने वाढली. बुधवारी दुपारी देशामध्ये ५३९ कोरोनाग्रस्त रुग्ण होते. हाच आकडा मंगळवारी ६७ ने वाढला होता.सध्या ही बातमी सकारात्मक असली तरी ही प्राथमिक आकडेवारी आहे. २४ तासांमध्ये कोरोनाग्रस्तांचा देशातील संख्या वाढण्याची गती मंदावली असली तरी लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी अनेक लोकांनी जिवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाजारांमध्ये गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. अमेरिका आणि भारताची तुलना केली असता अमेरिकेतील रुग्णांची संख्या ही भारतापेक्षा अधिक झपाट्याने वाढताना दिसत आहे.भारतामध्ये बुधवारी रात्रीपर्यंत कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ११ वर पोहचली आहे. भारतामध्ये कोरोनाची चाचणी करण्यासाठी काही अटी आणि नियम ठेवण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असली तर किंवा परदेशात जाऊन आला असाल तरच चाचणी केली जाईल असे यंत्रणांमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. असे असतानचा आता खासगी लॅबलाही करोनाची चाचणी करण्याचा अधिकार सरकारकडून देण्यात आल्याने चाचणी करण्याचे प्रमाण वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र जगभराप्रमाणे भविष्यात भारतामध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढेल असे मानले जाते आहे. त्यामुळेच करोनाचा कमीत कमी प्रसार व्हावा यासाठी नागरिकांनी घरातच बसावे असे आवाहन सरकारी यंत्रणांद्वारे केले जात आहे.
चीननंतर आता युरोप आणि अमेरिका हे कोरोना संसर्गाचा नवा केंद्रबिंदू ठरत आहे. आज (बुधवार) सकाळपर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची जगभरातील संख्या २१ हजारहून अधिक झाली आहे. यामध्ये इटली, चीन, स्पेन, इराण आणि फ्रान्स या पाच देशांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. गुरुवार सकाळपर्यंत जगभरामध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या चार लाख ६८ हजारहून अधिक झाला आहे. भारतात मंगळवार दुपारपर्यंत म्हणजेच लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर सोळा तासांनंतर गोवा, पुणे आणि झारखंडमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.सरकारी प्रयत्नांना जास्तीत जास्त यश यावे म्हणून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अनेक दिग्गज नेते, कलाकार, खेळाडूंनी नागरिकांना २१ दिवस किंवा जास्तीत जास्त काळ घरात थांबू आणि कोरोनाला हरवू अशापद्धतीचे आवाहन केल्याचे चित्र सोशल मिडीयावर करताना दिसत आहे.