मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात शटडाऊन, लॉकडाऊन, जमावबंदी, संचारबंदी अशा उपाययोजना राज्य सरकारने केल्या आहेत. याचाच गैरफायदा नफेखोरांनी घेतले असल्याचे चित्र दिसत आहे. अत्यावश्यक म्हणून धान्ये, कडधान्ये, भाजीपाला यांची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली असली तरी संचारबंदीचा नफेखोरांकडून गैरफायदा उचलला जात आहे. पुण्यासह मुंबईमध्ये भाज्यांचे दर अवाजवी लावत असल्याचे नागरिकांनी तक्रार केली आहे.
साधारण, गवार १२० रूपये किलो, ब्रेड ५० रूपये, कांदे ८० रुपये किलो, बटाटे ६० रुपये किलो रूपये असे अवाजवी दर लावून नागरिकांची लूट केली जात आहे. प्रशासनाने अशा नफेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. हातावर पोट असलेले नागरिक घरी बसले आहेत. त्यामुळे त्यांची मिळकत खुंटली आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाकडून भाजीपाल्याच्या वाहतुकीला बंदी नसली तरी आवक घटली आहे. त्याचाच फायदा घेत भाज्यांचे भाव वाढविण्यात आले आहेत.