नवी दिल्ली : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत सोमवारी अर्थसंकल्प २०२०–२१(वित्त विधेयक) चर्चेशिवाय संमत करण्यात आला. त्यानंतर लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावेळी अविरत सेवा देणाऱ्यांना उभे राहून टाळ्या वाजवित अभिवादन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील लोकसभेत उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा देशात झपाट्याने प्रादुर्भाव होत आहे, त्यामुळे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात यावे, अशी मागणी सर्वपक्षीय खासदारांनी केली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी लोकसभेच्या कामकाजास सुरूवात झाल्यानंतर सर्वप्रथम अर्थसंकल्प २०२० – २०२१ म्हणजे वित्त विधेयक चर्चेशिवाय संमत करण्यात आले. अर्थसंकल्पास चर्चेशिवाय संमत करण्यास सर्व पक्षांनी संमती दिली होती.
लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकुण २३ बैठका आणि एकुण १०९ तास कामकाज झाले. लोकसभेत ३१ जानेवारी रोजी राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणावर सुमारे १५ तास चर्चा झाली आणि त्यानंतर अभिनंदन प्रस्ताव संमत करण्यात आला. अर्थसंकल्पावर लोकसभेत एकुण १२ तास सविस्तर चर्चा झाली. त्याचप्रमाणे रेल्वेच्या अनुदान मागण्यांवर १२ तास, सामाजिक न्याय विभागाच्या मागण्यांवर ५ तास, पर्यटन मंत्रालयाच्या मागण्यांवर ४ तास चर्चा झाली आणि पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आली.
जनता कर्फ्यूचे लोकसभेने केले कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देशवासियांनी रविवारी म्हणजे २२ मार्च रोजी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्याचे मुक्तकंठाने कौतुक करीत देशवासियांनी करोना महासाथीचा सामना करण्यात राहण्याचे आवाहन केले. यावेळी बिर्ला यांनी सर्व सदस्यांना उभे राहून टाळ्या वाजवित अविरत सेवा पुरविणाऱ्यांना अभिवादन करण्याचे आवाहन केले. त्यानुसार लोकसभेने उभे राहून अभिवादन केले.
ते पुढे म्हणाले की, देशात कालचा दिवस अतिशय ऐतिहासिक होता. सरकार – विरोधी पक्ष, गरिब – श्रीमंत, पंथ, धर्म, संप्रदाय यातील भेद बाजुला ठेवून सर्वजण एकत्र आले होते, कालचे दृश्य म्हणजे या देशाचा आत्मा आहे. महासाथीचा सामना करण्यासाठी आज देश एकजुटीने उभा आहे, हे अतिशय महत्वाचे आहे. विशेष म्हणजे सायंकाळी पाच वाजता करोना महासाथीमध्येही अविरत सेवा देणाऱ्यांना देशाने अभिवादन केले ते अभुतपूर्व होते. त्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सभागृहातील सर्व सदस्य, मंत्री, काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांची कन्या, ज्येष्ठ नेते शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यासह अनेकांचा समावेश होता.