सलग पाच ‘टी-२०’ सामने जिंकत न्यूझीलंडला ‘व्हाईटवॉश’ देणार्या भारतीय क्रिकेट संघाला एकदिवसीय मालिकेनंतर आता पुन्हा कसोटी मालिकेतही हाराकिरीचा सामना करावा लागला. न्यूझीलंडच्या दौर्यावर सलग दुसर्या कसोटी सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर सर्व स्तरांतून टीका होत आहे. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवातून धडा घेतल्यानंतर आपल्या चुका सुधारत भारतीय संघ किमान दुसर्या सामन्यात तरी योग्य कामगिरी करेल, अशी आशा होती. मात्र, ती फोल ठरली. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आदी सर्व बाबींमध्ये भारतीय खेळाडूंपेक्षा प्रतिस्पर्धी संघाचे पारडे अधिक जड असल्याचे दिसून आले. या पराभवास नक्की जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित झाला असून याबाबत क्रिकेट समीक्षकांकडून विविध मत-मतांतरे व्यक्त करण्यात येत आहे. रोहित शर्मा, शिखर धवन यांसारखे अनुभवी सलामीवीर फलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल या सलामीवीरांना त्या जागी संधी मिळाली. मात्र, उत्तम फलंदाजी करून ते आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकले नाही. चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनाही चमकदार कामगिरी करता आलेली नाही. अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात असणार्या हनुमा विहारी, रवींद्र जडेजा यांनाही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. संघातील एकाही फलंदाजाला शतकी खेळी करता न आल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नाही. फलंदाजांप्रमाणे गोलंदाजांनाही प्रभावी मारा करता आला नाही. परिणामी, भारताला हाराकिरीचा सामना करावा लागला. कसोटी मालिकेत पराभूत झाल्यानंतर परदेशी धरतीवर भारतीय फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचे क्रिकेट समीक्षकांकडून चर्चिण्यात येत आहे. कसोटी क्रिकेटच्या प्रकारात भारतीय संघ सध्या अव्वल स्थानी आहे, तर न्यूझीलंड दुसर्या स्थानी विराजमान आहे. पहिल्या आणि दुसर्या क्रमांकाचे संघ असणार्या या दोन्ही संघांत रंगतदार लढत होईल, असे अपेक्षित होते. मात्र, तसे काही झाले नाही. भारतीय संघ प्रतिस्पर्ध्यांपुढे आव्हानच निर्माण करू शकला नाही. दिग्गज फलंदाजांची फौज असणारे खेळाडू असतानाही भारताला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे नाम बडे और दर्शन खोटे, अशीच काहीशी भारताची परिस्थिती झाली आहे.