मुंबई : कोरोनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. मुंबईमध्ये एका २२ वर्षीय महिलेला आणि उल्हासनगरमध्ये एका ४९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ४७ वर येऊन पोहचला आहे. भारतामध्ये आत्तापर्यंत १६६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. १४१ भारतीय आणि २५ परदेशी नागरिकांना लागण झाली आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वाधिक आहे. तर कोरोनाचा रुग्ण हा रत्नागिरीमध्येही सापडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा हा पहिला रुग्ण सापडला असल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दुबई येथून आल्यानंतर या रुग्णाला कोरोना संशयित म्हणून मंगळवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुबईतून आलेला ५० वर्षीय इसम कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून यंत्रणा सतर्क झाली आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक अशा एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.