७२ तासांत वसतिगृह रिकामे करावे; आयआयटी मुंबईचा विद्यार्थ्यांना आदेश
मुंबई : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आयआयटी मुंबईने पवई कॅम्पसमधील सर्व विद्यार्थ्यांना २० मार्चच्या आत वसतिगृहे रिकामी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंगळवारी १७ मार्चला सर्व विभागप्रमुखांची एक तातडीची बैठक झाली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
आयआयटी मुंबईचे संचालक सुभासिस चौधरी यांनी जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, 'मुंबई महानगरपालिका आणि अन्य प्रशासकीय आदेशांनुसार, शैक्षणिक संस्था ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना संस्थेतील डिपार्टमेंट्स, ग्रंथालये आदी सेवांचा लाभ ३१ मार्चपर्यंत घेता येणार नाही. या कालावधीत होस्टेलच्या मेसची सेवाही विस्कळीत असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वसतिगृहे रिकामी करावीत. पुढील ७२ तासांनी म्हणजेच २० मार्चनंतर कोणालाही संस्थेच्या गेटमधून आत वा बाहेर सोडण्यात येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शुक्रवारी २० मार्च रात्रीपर्यंत वसतिगृहे रिकामी करावीत.'
अभ्यासक्रमाविषयीच्या सूचना लवकरच देण्यात येतील. या सत्राचा अभ्यासक्रम ऑनलाइन घेण्यात येणार आहे, त्याबाबतच्या सूचना लवकरच देण्यात येतील, असेही संचालकांनी कळवले आहे.