राज्यात कोरोनाचे आणखी ४ रुग्ण: ३७ जणांना लागण
मुंबई : देशभरात कोरोनाची दहशत असताना आणि राज्य सरकारकडून कडक उपाययोजना केल्या जात असताना मुंबईकरांनी मात्र, या सर्व गोष्टींना तिलांजली दिल्याचे सध्या दिसत आहे. रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर महाविद्यालयीन तरुणी आणि पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे अशा सार्वजनिक ठिकाणांवर विषाणू फैलण्याची भीती सर्वाधिक असतानाच मुंबईकरांतर्फे सर्व नियम धाब्यावर बसवण्याचे काम सुरू आहे. कोरोनाचा प्रभाव काहीसा सोमवारी चाकरमान्यांच्या रेल्वेप्रवासावर जाणवला. मुंबईच्या दिशेने भरभरून जाणारे लोकलचे डबे रिकामी दिसले.
शाळा, महाविद्यालये, मॉल्स, सिनेमागृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने दिवसभरात या ठिकाणांवर वर्दळ कमी होती. मात्र, याऊलट पर्यटनाच्या ठिकाणी वाढती गर्दी ही चिंतेचा विषय मानला जात आहे. जाणकारांच्या मते, कोरोना बाधित एखादा रुग्ण जर गर्दीत फिरत असेल तर त्यांचे संक्रमण इतरांनाही होऊ शकते यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, याउलट परिस्थिती मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर दिसत आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा चारने वाढला आहे. सोमवारी आणखी चार जणांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे रुग्णांची आकडेवारी ३७वर पोहोचली आहे. मुंबईत तीन रुग्णांना तर नवी मुंबईत एका रुग्णाला याची लागण झाली आहे. राज्य सरकारने याविरोधात बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत. मात्र, देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रातच आढळले आहेत.
मुंबईत कलम १४४ लागू
राज्यात सर्वाधिक पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर मुंबईतही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागले. राज्यातील रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासन चिंतेत आहे. मुंबई पोलीसांनी रविवारी कलम १४४ लागू केले असून समुहाने फिरण्यास बंदी आणली आहे. चित्रपट आणि मालिकांचे चित्रिकरणही बंद करण्यास सांगितले आहे.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत पुण्यात १६, मुंबईत ८, नागपूरमध्ये ४, रायगड, नवी मुंबई आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी २, कल्याण, औरंगाबाद, अहमदनगर, ठाणे आदी ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.