भीषण अपघातात ३ ठार, तर १ जखमी मुंबई : वरळीमध्ये कार अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून यात सहा महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. शुक्रवारी हा भीषण अपघात झाला. बीएमडब्ल्यू कार रस्त्यावरील डिव्हायडरवर आदळली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कार भरधाव चालली होती. कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर कार चालवत असलेली महिला गंभीररित्या जखमी झाली. जखमी महिलेचे नाव नमिता चंद असे असून त्यांना उपचारासाठी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नमिता या अंधेरीतील राहणाऱ्या आहेत, असे सांगण्यात आले. या अपघातात ज्यांना जीव गमवावा लागला त्यात नमिता यांची सहा महिन्यांची मुलगी, ७० वर्षीय आई व ६२ वर्षीय नातेवाईक यांचा समावेश आहे.
वरळीतील मेला रेस्टॉरंट जंक्शनवर हा अपघात झाला. कार भरधाव वेगाने चालवत असताना अचानक कार स्पीड ब्रेकरवर चढली आणि कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. डिव्हायडरला वेगाने आदळल्याने कारही पूर्णपणे चेंदामेंदा झाली आहे.