'थिएटर कमांड'च्या रचनेला वेग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2020   
Total Views |


Indian security _1 &


भारताने इतर देशांचे अंधानुकरण न करता स्वतंत्र प्रारूप तयार करत 'थिएटर कमांड'चा निर्णय अंमलात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी भारताच्या भौगोलिक, सामरिक गरजा लक्षात घ्याव्या लागतील. स्वतंत्र धोरण ठरवावे लागेल. भारतासाठी 'थिएटर कमांड' निश्चित करताना ते भारताच्या गरजांनुसार बनवले पाहिजे.


२०२२ पर्यंत 'थिएटर कमांड' रचना अस्तित्वात येईल आणि त्याअंतर्गत पाच कमांड असू शकतील, असे जनरल बिपीन रावत यांनी अलीकडेच घोषित केले. भारतीय सैन्यदलांचे पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' म्हणून जनरल बिपीन रावत यांची नियुक्ती झाल्यानंतर 'थिएटर कमांड'च्या रचनेला वेग आला. त्यात जम्मू व काश्मीरची एक कमांड आणि नौदलाच्या अखत्यारितील पश्चिम व पूर्व कमांड एकत्र करून संपूर्ण सागरी आव्हानांसाठी एकच अशी द्विपकल्पीय किंवा 'पेनिन्सुलर कमांड' उभारली जाईल, असेही त्यांनी सूचित केले. 'थिएटर कमांड'वर सध्या विचारमंथन सुरू आहे आणि प्रत्यक्ष कार्यान्वित होणे तीन वर्षांमध्ये शक्य दिसत नाही. पण, 'थिएटर कमांड'च्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे, हे नक्की!

 

एकात्मिक प्रमुख काळाची गरज

 

भारतीय लष्कराच्या म्हणजे भूदलाच्या सात कमांड, वायुदलाच्या सहा आणि नौदलाच्या चार कमांड अशा एकूण १७ कमांडमध्येसंरक्षणदलाच्या तिन्ही दलांचा पसारा विभागलेला आहे. प्रत्यक्षात एखाद्या क्षेत्रामध्ये लढाईची वेळ येते, तेव्हा मात्र लष्कर, वायुदल आणि नौदल यापैकी दोन किंवा तिन्ही दलांना आता एकमेकांमध्ये समन्वय राखून एकत्रित कारवाई करण्याची वारंवार गरज भासते. केवळ युद्धच नव्हे, तर पूर, त्सुनामी, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी शोध व बचावकार्य आणि मदत पुरवतानाही कधी नौदलाच्या युद्धनौकांवरून लष्करी तुकड्या पाठवाव्या लागतील, तर कधी वायुदलाच्या युद्धसामग्रीवाहक विमानांमधून लष्करी साहित्य, सैनिक उतरवले जातात. या सर्व गरजा पाहता तिन्ही दलांमध्ये समन्वय राखणारा एकात्मिक प्रमुख, 'थिएटर कमांड' असणे ही काळाची गरज आहे.

 

'थिएटर कमांड'ची संकल्पना

 

'थिएटर कमांड'ची गरज सर्वप्रथम १९७१च्या लढाईनंतर भारताचे सेनापती फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी व्यक्त केली होती. कारण, १९७१च्या लढाईनंतर त्यांना हे लक्षात आले होते की, जर सर्व एकत्रित असते तर झालेली लढाई अजून जास्त चांगल्या पद्धतीने लढता आली असती. युद्धाचे डावपेच सदैव बदलत असल्यानेच, युद्ध किंवा युद्धसदृश कारवाया आता विशिष्ट सैन्यदलापुरत्या मर्यादित राहणार नाहीत. युद्धातील अशा बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठीच भारतात 'थिएटर कमांड' गरजेचे आहे. १९७१ मध्ये भूदल आणि वायुदल यांनी एकत्रित कारवाई केली, त्याचे मुख्य कारण होते, फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचे उत्तुंग, भव्य व्यक्तिमत्त्व़! मात्र, १९६२ आणि कारगिल युद्धात अनेक कमतरता दिसून आल्या. आता तंत्रज्ञान वेगाने बदलते आहे आणि उपग्रह व अवकाशाचाही वापर संरक्षणासाठी होऊ लागला आहे. युद्धाचे डावपेच बदलत असल्यानेच, युद्ध किंवा युद्धसदृश कारवाया आता विशिष्ट सैन्यदलापुरत्या मर्यादित राहणार नाहीत. अशा बदलत्या आव्हानांना अनुसरूनच भारतातही 'थिएटर कमांड' अस्तित्वात येत आहे. युद्धाच्या आव्हानांनुसार भारतीय संरक्षणदलातील तिन्ही दलांचे मनुष्यबळ, त्यांची युद्धसामग्री, शस्त्रे, दारूगोळा, रसदपुरवठा, याचे एकत्रिकरण झाले पाहिजे आणि सर्व प्रकारच्या लढाया एकत्रित लढल्या पाहिजे.

 

१७ कमांड कार्यरत

 

सध्या संरक्षण दलाच्या तिन्ही शाखांमध्ये मिळून १७ कमांड कार्यरत आहेत. लष्कर - ७, वायुदल - ७, नौदल - ३, एकत्रित कमांड्स-'अंदमान निकोबार कमांड' व 'स्ट्रेजिक फोर्सेस कमांड' असे कमांड आहेत. या कमांड सर्वसाधारणपणे भौगोलिक सीमांनुसार आहेत. त्याअंतर्गत प्रत्येक सैन्यदलामध्ये फौजफाटा व सामग्रीची विभागणी केलेली असते. लष्कराच्या उत्तर कमांडकडे काश्मीरमधीलकारवायांची जबाबदारी येते. त्याचप्रमाणे पूर्व कमांडकडे ईशान्येतील कारवाया व चीनच्या सीमांची जबाबदारी असते. नौदलाच्या पश्चिम कमांडकडे अरबी समुद्र आणि पाकिस्तानचे आव्हान, तसेच आखातातून येणाऱ्या व्यापार उदिमाच्या संरक्षणाची, तेलफलाटांची जबाबदारी असते. भारतीय वायुदलाच्या दक्षिण आणि वायव्य कमांडकडे मुंबई, तसेच पाकिस्तानलगतच्या वाळवंटापर्यंतच्या सीमांची जबाबदारी असते. प्रत्यक्षात मात्र तिन्ही दलांमध्ये समन्वय राखून कारवाई करणे गरजेचे असते. कधी 'सर्जिकल स्ट्राईक' करता तुकड्या उतरवताना किंवा शस्त्रे-दारूगोळा पोहोचवताना लष्कराला हेलिकॉप्टर वा विमानांची गरज असते. कधी अ‍ॅम्फिबिअस युद्धाकरिता एखाद्या बेटावर नौकेतून सैनिकी तुकड्या, रणगाडे नेणे आवश्यक ठरते. 'थिएटर कमांड'ची संकल्पना प्रथम १९५९ मध्ये ब्रिटन, १९८६ मध्ये अमेरिका, फ्रान्स, चीन, जपाननेही स्वीकारली. भारत मात्र काहीच करत नव्हता. या पुनर्रचनेचा सर्वात मोठा फायदा साधनस्रोतांच्या वापरातील खर्चाची पुनरावृत्ती टळू शकेल. जसे क्षेपणास्त्रे, हेलिकॉप्टर रिपेअर डेपो या सुविधा जर एखाद्या कमांडमध्ये तिन्ही दलांना लागत असतील, तर त्या एकत्रितरीत्या वापरता येऊ शकतात. कमांडच्या स्थापनेमागे जो हेतू प्राधान्यक्रमावर असेल, त्या हेतुनुसार तिन्ही दलापैकी कुणाकडे नेतृत्व द्यायचे, ते निश्चित होईल. पहिल्या कमांडची स्थापना केल्यावर मिळालेल्या अनुभवानुसार काही दुरुस्त्या कराव्या लागतील.

 

'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' उत्तरदायी

 

या सर्व कमांडचे नेतृत्व करणारे कमांडर दिल्लीतील मुख्यालयात असलेल्या 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' यांना उत्तरदायी असतील आणि या सर्वांच्या तसेच तिन्ही दलांच्यावतीने 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' हे संरक्षणमंत्री व पंतप्रधानांच्या संपर्कात राहून योग्य ती व्यूहरचना, रणनीती आखू शकतील. त्यामुळे यापूर्वीच्या युद्धामध्ये तिन्ही दलांकडून वेगवेगळ्या सूचना सरकारकडे जाण्याचा धोकाही टळू शकेल. त्याचबरोबर उपलब्ध संसाधनांचा अचूक वापर होणेही शक्य होईल. तसेच गुप्तवार्तांचे संकलन, मनुष्यबळ व्यवस्थापनही अधिक चांगल्या पद्धतीनेही होईल. अत्याधुनिक पद्धतीच्या युद्धामध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक यंत्रणा खूप मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात. त्याचबरोबर एकूणच लष्करी संसाधनेही मर्यादित असतात. त्यांचा गरजेनुसार योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने वापर करणे शक्य होईल.

 

अजून काय करावे?

 

कोणत्याही युद्धात १७ कमांड एकत्र लढाई लढू शकत नाहीत. मात्र, नवी प्रणाली कार्यान्वित करण्यापूर्वी त्याची पुनर्रचना करावी लागेल. काही कमांड तिन्ही शाखांच्या असतील, तर काही कमांड दोन सैन्यदलांपुरत्याही असतील. सभोवतीची आव्हाने, पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांची लष्करी ताकद, तंत्रज्ञानातील बदल, घुसखोरी या सर्व गोष्टींच्या निकषावर सैन्यदलांच्या गरजा काय, खरेदी काय करावयाची, प्रशिक्षण कसे द्यायचे, आपली भूमिका काय ठेवायची, याची तत्त्वप्रणाली प्रत्येक सैन्यदल सध्या स्वतंत्रपणे तयार करते. भविष्यात नव्या रचनेत ही 'डॉक्ट्रिन' संयुक्तपणे तयार करावी लागतील. प्रत्येक 'थिएटर कमांड'चे 'डॉक्ट्रिन' वेगळे असेल. सध्या तर प्रत्येक सैन्यदलाचा आर्थिक आराखडा, अर्थसंकल्पही वेगवेगळा असतो, आता तोही कमांडच्या गरजांनुसार एकत्र करावा लागेल.

 

'थिएटर कमांड' भारताच्या गरजांनुसार

 

संयुक्त कमांडमध्ये तिन्ही दलांना लागणाऱ्या आधारभूत सुविधा एका छत्राखाली येतील. जसे रसदपुरवठा व नियोजन (लॉजिस्टिक्स), रुग्णालये-वैद्यकसेवा, इंजिनिअरिंग पायाभूत सुविधा, प्रशिक्षण. या सेवांचा वापर एकाच छत्रातून झाला, तर निधी वाचेल. 'थिएटर कमांड' उभारताना आव्हानांनुसार फौजफाटा व साधनसामग्री देता येईल. आपल्याकडे यापूर्वीच पाकिस्तान व चीनच्या सीमांवर 'इंटिग्रेटेड बॅटल' ग्रुपचा प्रयोग भारतीय लष्करांतर्गत करण्यात आला. पाक सीमेवर पश्चिम कमांडअंतर्गत ९ कोअर व पूर्व कमांडअंतर्गत चीन सीमेवर १७ कोअर या आयबीजीच्या तुकड्या उभारून त्यांना पायदळ व इतर सामग्री एका छत्राखाली देण्याची योजना राबवण्यात आली आहे. 'थिएटर कमांड'कडे वाटचाल ही सैन्यदलांमधील समन्वयाच्या दृष्टीने आवश्यक आहे. अनेक युद्धसराव मोहिमांमध्ये तिन्ही दले एकत्र भाग घेतात, त्याची वारंवारिता यापुढे वाढवावी लागेल व कमांड-कंट्रोल, आदेश-समन्वय या बाबींचा सराव करावा लागेल. भविष्यातले युद्ध कोणतेही एक सशस्त्र दल स्वबळावर लढवू शकणार नाही. त्यासाठी तिन्ही सशस्त्र दलांच्या एकत्रीकरणाची गरज आहे. त्याचसाठी तिन्ही दलांच्या एकत्रित मुख्यालयांची (थिएटर कमांड) शिफारस केली गेली. त्या दिशेने भारताने नुकतेच पहिले पाऊल टाकले आहे. यापुढे मात्र, भारताने इतर देशांचे अंधानुकरण न करता स्वतंत्र प्रारूप तयार करत 'थिएटर कमांड'चा निर्णय अंमलात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी भारताच्या भौगोलिक, सामरिक गरजा लक्षात घ्याव्या लागतील, स्वतंत्र धोरण ठरवावे लागेल. भारतासाठी 'थिएटर कमांड' निश्चित करताना ते भारताच्या गरजांनुसार बनवले पाहिजे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@