नवी दिल्ली : जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोनाने भारतामध्येही थैमान घातले आहे. भारतामध्ये तब्बल ७३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, सर्व स्तरांतून कोरोनाचा व्हायरसचा प्रादुर्भाव भारतामध्ये जास्त होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. तर आता दिल्लीमध्ये राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये तसेच चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय़ घेतला आहे. तसेच, सर्वांनी या निर्णयासाठी सहकार्य करावे असे आवाहनही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ६० पर्यंत पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर देशामध्ये पहिल्यांदा दिल्ली राज्यसरकारने शाळा, महाविद्यालय आणि चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटगृहे ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. शाळा आणि महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे." अशी माहिती अरविंद केजरीवाल य़ांनी दिली. तसेच, "कोरोना बाधितांच्या उपचारांसाठी ५०० पेक्षा जास्त बेडची व्यवस्था रुग्णालयांमध्ये सज्ज करण्यात आली आहे. आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे." असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना केले आहे.