मुंबईच्या गोरेगावमधील मसुराश्रमात, ब्रह्मचारी विश्वनाथजींकडून परागबुवा रामदासी यांना १९८८ साली अनुग्रह लाभला. १९९४ पर्यंत तुंगारेश्वराच्या जंगलात ईश्वरफरी मंदिरामध्ये साधना केली. नंतर १९९७ ते २००० पर्यंत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. विश्व हिंदू परिषदेत सक्रीय होताना ध्येयाचा मार्ग त्यांना सापडला. वांगणीला १९९५ साली वास्तुकार नगरात स्थापन केलेल्या रामदास सेवाश्रमाच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले.
हळूहळू रामदास आश्रमाची वास्तू साकार होऊ लागली. सेवाकार्य चौफेर उभे करण्यासाठी परागबुवांनी शून्यातून विश्व उभे केले. सध्या बुवांनी वांगणीतील चार मंदिरांवर कळस चढविला. ते विहिंपच्या कोकण प्रांत (मुंबई ते गोवा) धर्मप्रसारक विभागाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत करीत असतात. रामदास सेवाश्रम हे सेवाकेंद्र आहे. तिथेे समाजाच्या अनेक समस्यांवर मंथन केले जाते. समस्यांवर उपाययोजना केल्या जातात. त्याअंतर्गत दर शनिवारी सकाळी १० ते १ नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात येतेे. सुमारे चार हजारांपेक्षा जास्त लोकांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पडली आहेत. बदलापूर-वांगणी परिसरातील अंदाजे ७० वनवासी, वनवासी पाडे, २५-३० गावे यांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे.
वृद्धसेवा अंतर्गत निराधार गरजू वृद्धांची आश्रमामध्ये व्यवस्था केली जाते. गोसेवा संरक्षण व संवर्धनाकरिता येथे गोशाळेची निर्मिती केली आहे. सत्यांना बुवांनी वांगणीतील आपल्या गोशाळेत आसरा दिला आहे. कंपोस्ट खत मोठ्या प्रमाणावर निर्माण केले जाते. कान्होरच्या सहा महिन्यांपूर्वीच्या कारवाईमुळे, गोसेवेसाठी गोसंरक्षणाचे आवाहन करून गोवंश वाचवण्याचे कार्य आश्रमातर्फे केले जाते. त्याला पुष्टी मिळाली आहे. मात्र, त्यामुळे संख्येत एकदम वाढ झाल्याने जबाबदारीत वाढ झाल्याने शहरातील दानशूर गोसेवकांना या पवित्र कार्यास यथाशक्ती दान करून गोसेवेचे पुण्य प्राप्त करावे, असे आवाहन केले आहे.
गाईच्या दुधापासून बनविलेले व आय केंद्रातून मागविलेल्या, दैनंदिन उपयोगी, आयुर्वेदिक (निवडक) औषधांची विक्री ग्रामीण बरोबर शहरवासीयांसाठी येथे केली जाते. या औषधांद्वारे अनेक चिवट दुखण्यातून रुग्ण सावरले आहेत. मात्र, परागबुवा सध्याच्या कार्याच्या प्रगतीवर थांबलेले नाहीत. सुसज्ज गोशाळा बनविण्याबरोबरच औषधी वनस्पतीनिर्मिती, वृक्षलागवड व संवर्धन योजना साकारणे, वनौषधी संशोधन व निर्मितीसाठी केंद्र निर्माण करणे पहिल्या व दुसर्या माळ्यावरही सभागृह बांधणे, मंदिराला कळस चढविणे, समर्थ मंदिराचा जीर्णोद्धार करणे, श्री समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचे साहित्य, प्रकाशन, प्रचार व प्रसार करणे धार्मिक उत्सवांचे आयोजन करणे , यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या श्रीराम मंदिर तळमजल्याला सभागृहाची जोड मिळाली आहे. दुसर्या माळ्यावर शिवमंदिर तयार झाले आहे.
वांगणी येथील ढवळे शिव मंदिरात १९९५ साली प्रथम दासनवमी उत्सव सुरू झाला. समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा प्रचार-प्रसार खेडोपाडी करतानाच त्यांनी केलेले आध्यात्मिक कार्य, दासबोधाची शिकवण, बलोपासना इत्यादी आजच्या पिढीला अवगत करून देण्याचा प्रयत्न रामदास सेवाश्रमातर्फे सातत्याने करण्यात येतो. २०२०-२१ हे आश्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने अधिकाधिक लोकांपर्यंत हे कार्य पोहोचावे व सेवेचा लाभही जास्तीत जास्त गरजूंपर्यंत जावा, अशा सामूहिक प्रयत्नांची आखणी केली आहे.
सेवाकार्य व धार्मिक संस्कारांचा सुरेख मेळ साधणार्या परागबुवांनी आश्रमात उत्सवाच्या माध्यमातून, धार्मिक, सामाजिक प्रबोधनाची, समरसतेची सांगड घातली आहे. नऊ दिवस रामनवमी व नऊ दिवस दासनवमी येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. वर्षातून एकदा यज्ञाचे आयोजन करून, पौरोहित्याचा मान महिला पुरोहितांना दिला जातो. उपक्रम सुरू झाल्यापासून मैत्रेयी पुरोहित मंडळ, विहिंप, डोंबिवलीच्या महिला पुरोहितप्रमुख गौरीताई सदाशिव खुंटे व सहकारी ही धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. सर्व जातीजमातीला यज्ञाला आहुती देण्याची संधी येथे सहजच दिली जाते. या उत्सवात दासबोध पारायण, प्रवचन, भक्तीसंगीत, गावोगावची भजने, रोज रात्री कीर्तने, दोन्ही वेळा महाप्रसाद आरतीनंतर दिला जातो.
(संपर्क: परागबुवा रामदासी - ९८५०८७९८२९)