नवी दिल्ली : “अयोध्येतील श्रीराम मंदिर पुढच्या दोन वर्षांत म्हणजे २०२२मध्ये बांधून पूर्ण होईल, असा दावा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे ट्रस्टी कामेश्वर चौपाल यांनी रविवारी केला.
राम मंदिराच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारतर्फे नियुक्त करण्यात आलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमधील सर्व सदस्यांची पहिली बैठक प्रयागराज येथे १९ फेब्रुवारीला होणार होती. मात्र ही बैठक आता नवी दिल्ली येथे होणार असल्याची माहिती आहे. यासाठी सर्व सदस्य १८फेब्रुवारीपर्यंत दिल्लीत दाखल होणार असल्याचे समजते. अयोध्येतील रामजन्मभूमीवर भव्य-दिव्य असे राम मंदिर उभारण्यावर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. तसेच मंदिराचे बांधकाम कधी सुरू करायचे? याची तारीखही या बैठकीत निश्चित केली जाणार आहे.
आधी ६७ एकर जमिनीचे मोजमाप केले जाईल. यानंतर ही जमीन समतोल केली जाईल. मग शिलान्यास केला जाईल आणि त्यानंतर मंदिराचे बांधकाम विशेष तिथी आणि दिवस पाहून सुरू केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचा शिलान्यास करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे चौपाल यांनी यावेळी सांगितले. श्रीराम मंदिरासाठी ६७ एकर जमीन पुरेशी नाही. आणखी जमिनीची गरज आहे, असेही ते म्हणाले.