मुंबई : महाराष्ट्रामध्ये सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर आता जनसामाणसात आक्रोश निर्माण झालं आहे. अशामध्ये 'राज्य सरकार अजून किती निर्भयांचे बळी जाण्याची वाट पाहणार आहे?' असा संतप्त सवाल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी विचारला आहे. महिला अत्याचाराच्या गेल्या ४ दिवसांमध्ये ५ घटना घडल्या. पनवेल तालुक्यातील शारदा माळी या महिलेच्या मृत्यूप्रकरणी चित्रा वाघ यांनी दुंदरे या गावी जाऊन मृत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. शुक्रवारी याप्रकरणी ४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पण महिलांच्या सुरक्षेसंदर्भात सरकार कधी पाऊल उचलणार ? असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून केला जात आहे.
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये महिलेला जिवंत पेटवण्याची ४ दिवसातील ५ वी घटना लातूर शहरात येथे घडली. राज्याचे गृहमंत्रालय काय करत आहे ? सुरक्षा नाहीच पण जळीत महिलांची विटंबना मात्र गृह मंत्री अनिल देशमुख करत आहेत. नक्की राज्याची वाटचाल चाली कुठे आहे?" अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. पहिले वर्धामध्ये तरुणीला जाळण्यात आले. त्यानंतर औरंगाबादमध्येही महिलेला जाळल्यामुळे प्राण गमवावा लागला. तसेच, मुंबईमधील दादर माटुंगा ब्रिजवर छेडछाडीच्या घटना समोर आल्या. त्यानंतर पनवेलमध्ये शारदा माळी या महिलेची हत्या करण्यात आली. तर, लातूरमध्येही १८ वर्षीय तरुणीला जाळण्यात आले. त्यामुळे राज्यामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.