नवी दिल्ली : भाजपचे युवा खासदार तेजस्वी सूर्य यांनी दिल्लीतील शाहीन बाग इथे सुरू असलेल्या आंदोलनावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. बहुसंख्य समुदायाने सतर्क रहावे, अन्यथा देशात पुन्हा मुघल शासन परतण्याची शक्यता आहे, असे तेजस्वी सूर्या म्हणाले. तडफदार भाषणांसाठी ओळखले जाणारे तेजस्वी सूर्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव चर्चेत बोलत होते.
विरोधकांवर शाब्दिक हल्लाबोल करत सूर्या म्हणाले, “शेजारच्या मुस्लीम बहुसंख्य देशात धार्मिक अत्याचाराला बळी ठरलेल्या लोकांना सीएएमुळे नागरिकत्व मिळेल. पण याला विरोध केला जात आहे. येणारी पिढी विरोध करणारांना कधीही माफ करणार नाही. विरोधकांना मुद्दे संपू द्यायचे नाहीत, जेणेकरुन ते मुद्दे निवडणुकांमध्ये व्होट बँकसाठी वापरता येतील.” असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामाचे कौतुक केले.