नवी दिल्ली : कोरोनाग्रस्त चीनमधून भारताने आपल्या ६४० नागरिकांसह मालदिवच्या ७ नागरिकांना बाहेर काढले आहे. पाकिस्तानने भारताकडे विनंती केल्यास वुहान प्रांतात अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांनाही बाहेर काढले जाईल, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकारपरिषदेत गुरुवारी केले.
परराष्ट्र मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत प्रवक्ते रवीश कुमार यांनी भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी चीन सरकारतर्फे मिळालेल्या सहकार्याविषयी आभार मानले. ते म्हणाले की, भारत सरकारने एअर इंडियाच्या दोन विमानांद्वारे वुहान प्रांतात अडकलेल्या ६४० भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले असून. त्याचप्रमाणे मालदीवच्याही ७ नागरिकांना परत आणण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चीनमधून येणाऱ्या नागरिकांसाठीच्या ई-व्हिसावर तात्पुरत प्रतिबंध लावण्यात आला आहे. चीन आणि भारतादरम्यान विमानांच्या व्यावसायिक उड्डाणांवर प्रतिबंध लावण्यात आलेला नाही. मात्र, परिस्थितीचा आढावा घेत त्याविषयी निर्णय घेण्यास विमान कंपन्या स्वतंत्र असल्याचेही त्यांनी सांगितले.
तर पाकिस्तानी नागरिकांनाही बाहेर काढू...
पत्रकारपरिषदेत चीनमधील वुहानमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांविषयी प्रश्न विचारला. त्या विद्यार्थ्यांनी नुकताच एक व्हीडिओ प्रसारित केला असून त्यामध्ये पाकिस्तान सरकार आम्हाला बाहेर काढण्यासाठी काहीही करीत नसल्याचे सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत भारताने त्याविषयी काही विचार केला आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर उत्तर देताना रवीश कुमार म्हणाले की, अद्याप तरी पाकिस्तान सरकारकडून तशा प्रकारची विनंती आलेली नाही. मात्र, तशी विनंती आल्यास, परिस्थिती आणि भारताकडे असलेल्या संसाधनांचा विचार करता आम्ही त्यावर जरूर विचार करू, असेही रवीश कुमार यांनी सांगितले.