सीताराम येचुरी यांच्याप्रमाणे असेच तारे ‘मुस्लीम इत्तेहादुल मुसलमीन’चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी तोडले आहेत. देशातील समस्त मुस्लीम समाजाची काळजी केवळ आपणासच आहे, अशा थाटात हे महाशय बोलत असतात. भाजप, संघ परिवार यावर सदैव आगपाखड केल्याशिवाय त्यांचे नेतृत्व सिद्धही होत नाही. त्यामुळे तशी बडबड करीत राहण्याशिवाय त्यांच्यापुढे गत्यंतर नाही.
सध्या ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’वरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जो कायदा अस्तित्वात आणला, त्यावरून देशात फूट कशी पडेल, असा प्रयत्न विविध राजकीय नेत्यांनी सुरू केला आहे. त्यामध्ये काँग्रेस, समाजवादी पक्ष, साम्यवादी पक्ष, मुस्लीम लीग, मुस्लीम इत्तेहादुल मुसलमीन आदी पक्षांच्या नेत्यांसह अनेक नेते आघाडीवर आहेत. या सर्व नेत्यांचा सध्या एककलमी कार्यक्रम आहे. तो म्हणजे ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’वरून जनतेच्या मनामध्ये भ्रम निर्माण करून, त्यावर आपली राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल हे पाहणे! देशात दिल्लीसह काही ठिकाणी पावसाळ्यातील कुत्र्यांच्या छत्र्याप्रमाणे उगवलेल्या ‘शाहीनबागा’ हे त्याचेच द्योतक नाही का? ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ मुस्लीम समाजाच्या विरुद्ध असल्याचे सांगून त्या समाजास भडकविले जात आहे. देशामध्ये फूट पडण्यासाठी टपून बसलेल्या राजकीय शक्ती अशा आंदोलनांना साहाय्य करीत आहेत. या आंदोलनामुळे देशातील वातावरण बिघडेल आणि त्याचा राजकीय लाभ आपणास उठविता येईल, याची अनेक नेते प्रतीक्षा करीत आहेत. अशा नेत्यांमध्ये सीताराम येचुरी आणि असदुद्दीन ओवेसी आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
सीताराम येचुरी यांनी मध्यंतरी म्हटले की, “आणीबाणीमध्ये इंदिरा गांधी यांना सत्तेवरून घालविण्यासाठी जसा लढा उभारण्यात आला होता, तसा लढा उभारून या सरकारविरुद्ध संघर्ष करू.” इंदिरा गांधी यांनी सर्व लोकशाही संकेत पायदळी तुडवून सत्ता आपल्या ताब्यात ठेवली होती. हजारो विरोधकांना कारावासात टाकले होते. आपल्या हुकुमशाही राजवटीला या सर्वांकडून विरोध होईल, या भीतीने त्यांनी हे कृत्य केले होते. पण, “आता आम्ही त्याप्रमाणे आंदोलन करू,” अशी घोषणा येचुरी यांनी केली आहे. सीताराम येचुरी असे बाष्कळ भाष्य करताना आणीबाणीचे काळेकुट्ट पर्व सोयीस्कररीत्या पार विसरून गेले. देशामध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठी तत्कालीन जनसंघ आणि संघ परिवारातील असंख्य कार्यकर्ते आघाडीवर होते, याचा विसर त्यांना सध्या पडलेला दिसतोय. लोकशाहीसाठी लढा दिलेल्या राष्ट्रीय विचारांच्या संघटना आणि नेत्यांवर वाट्टेल ते आरोप करून त्यांना बदनाम करण्याची जी मोहीम या नेत्यांनी उघडली आहे, त्यास देशातील जनता मुळीच धूप घालणार नाही हे उघडच आहे.
मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’विरोधात ‘सविनय कायदेभंग मोहीम’ हाती घेण्याची राणा भीमदेवी घोषणा त्यांनी केली आहे. येचुरी, आपली ताकद किती आणि आपण बोलताय किती? कशासाठी करताय आपण हे सर्व? लोकशाही मार्गाने जे सरकार सत्तेवर आले, त्या सरकारला सत्तेवरून दूर करण्यासाठीच आपले हे सर्व प्रयत्न चालले आहेत ना? ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिल्यानंतरच अस्तित्वात आला, याचा विसर आपणास एवढ्यातच पडला? विद्यमान सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनांप्रमाणे त्यांची पूर्तता करण्यासाठी जी पावले उचलली, ते आपल्या अजून लक्षात येत नाही का? लोकशाहीमध्ये बहुमताने सत्तेवर आलेल्या सरकारला देशहिताच्या दृष्टीने आवश्यक असलेले कायदे करण्याचा अधिकार नाही का? आपण ज्या ‘सविनय कायदेभंगा’ची भाषा करीत आहात ती न शोभणारी आणि निषेधार्ह आहे. भाजप सरकारविरुद्ध अत्यंत आदळआपट करूनही ते सरकार पुन्हा सत्तेवर आले आणि ठोस निर्णय घेऊ लागले हे तुमच्या डोळ्यांमध्ये खुपत असल्यानेच ही भाषा करीत आहात ना?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात बोलताना, जी ‘ऐतिहासिक घोडचूक’ झाली होती ती आम्ही ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ करून दुरुस्त केली आहे, असे म्हटले होते. हा कायदा देशातील कोणाही नागरिकाविरुद्ध नाही, अगदी मुस्लीम नागरिकांविरुद्ध नाही, हे संसदेमध्येही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले असताना, त्यावरून कशाला जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न चालविलाय तुम्ही? त्यास जनता भुलेल असे आपणास वाटते काय? हा कायदा देशातील कोण नागरिकाविरुद्ध नसल्याचे सांगूनही हा कायदा देशातील गरिबांच्या विरुद्ध असल्याची आवई उठवून त्यांना चिथविण्याचे प्रयत्न होत आहेत. पण, याच जनतेने मोदी सरकारला बहुमताने निवडून दिले आहे हे लक्षात ठेवावे! देशातील जनता सूज्ञ आहे. त्या जनतेस आपले भलेबुरे चांगले कळते! त्यामुळे त्या जनतेस भ्रमित करण्याचे प्रयत्न सफल होणार नाहीत.
‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’वरून विरोधकांचे जे राजकारण चालले आहे, ते देशातील जनता पाहत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. असे सर्व असूनही जनता शांत आहे, हे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले आहे. या कायद्यावरून देशामध्ये असंतोष माजविण्याचे प्रयत्न सफल होणार नाहीत, हे सर्व विरोधकांनी लक्षात घ्यायला हवे! देशातील जनतेने ज्या विश्वासाने मोदी सरकार सत्तेवर आणले ती जनता, तुमच्या भ्रामक प्रचारास बळी पडणार नाही. या विरोधामागे तुमचा दडलेला स्वार्थ लोकांपुढे येऊ लागला आहे. त्यामुळे जनता तुम्हास योग्यवेळी धडा शिकविल्यावाचून राहणार नाही. ‘सविनय कायदेभंगा’ची घोषणा केली की, सगळा देश आपल्यामागे उभा राहील, असल्या खोट्या भ्रमात राहू नका, एवढेच सीताराम येचुरी यांनी लक्षात घ्यावे!
सीताराम येचुरी यांच्याप्रमाणे असेच तारे ‘मुस्लीम इत्तेहादुल मुसलमीन’चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी तोडले आहेत. देशातील समस्त मुस्लीम समाजाची काळजी केवळ आपणासच आहे, अशा थाटात हे महाशय बोलत असतात. भाजप, संघ परिवार यावर सदैव आगपाखड केल्याशिवाय त्यांचे नेतृत्व सिद्धही होत नाही. त्यामुळे तशी बडबड करीत राहण्याशिवाय त्यांच्यापुढे गत्यंतर नाही. ओवेसी यांनीही, ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’विरोधात ‘जेल भरो अभियान’ करण्याची घोषणा केली आहे. तिकडे सीताराम येचुरी यांनी केलेली घोषणा आणि इकडे असदुद्दीन ओवेसी यांची ही घोषणा पाहता वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याची कल्पना यावी. केंद्र सरकारविरुद्ध मुस्लीम समाजास चिथविण्याचा प्रयत्न ओवेसी यांनी चालविला आहे, हे यावरून दिसून येते. देशातील सर्व तुरुंगांची क्षमता अवघी तीन लाख आहे. आम्ही सर्व रस्त्यांवर उतरलो तर कारागृहे अपुरी पडतील, असे त्यांनी म्हटले आहे. सीताराम येचुरी, ओवेसी यांच्यासह विविध मोदी विरोधकांची पावले कोणत्या दिशेने पडत आहेत त्याची यावरून कल्पना यावी. ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’वरून जनतेला भ्रमित करण्याचे हे प्रयत्न फार काळ चालणार नाहीत, हे या नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे! हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन देशाची आणि विद्यमान सरकारची बदनामी करण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. पण, ते प्रयत्नही यशस्वी होताना दिसत नसल्याचे पाहून विरोधकांचा तीळपापड होणे स्वाभाविक आहे. त्यातूनच, पूर्णपणे लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या सरकारने जे निर्णय लोकशाही संकेतानुसार घेतले, त्यास चूड लावण्यास येचुरी, ओवेसी यांच्यासारखे अनेक स्वार्थी नेते निघाले आहेत. पण, त्यांचे प्रयत्न जनता मुळीच सफल होऊ देणार नाही!