विदर्भात तुरळक पावसाची शक्यता
मुंबई : राज्याच्या तापमानात सध्या झपाट्याने बदल पहायला मिळत आहेत. किनारपट्टीच्या भागात मुंबईसह कोकणात सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. तर, विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
कोकण विभाग वगळता राज्याच्या इतर भागांत सध्या रात्रीच्या किमान तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने थंडी पुन्हा बहरली आहे. उत्तरेकडून थंड वारे राज्याच्या दिशेने पुन्हा येऊ लागले आहेत. किनारपट्टीच्या भागात मात्र उष्ण वाऱ्यांचे प्रवाह आहेत. परिणामी कोकण विभागात सध्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ४ ते ६ अंशांनी वाढला असून, मुंबईत गुरुवारी मोसमातील सर्वाधिक ३८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
गेल्या तीन वर्षांतले ते सर्वाधिक तापमान आहे. तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी १६ ते १७ अंशांवर गेलेले किमान तापमान दोन दिवसांपासून १२ ते १३ अंशांवर आले आहे. कमाल तापमानही सरासरीखाली आल्याने उन्हाचा पारा कमी झाला आहे. नाशिकमध्ये राज्यातल्या सर्वात कमी, १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाडय़ातही किमान आणि कमाल तापमानात घट झाली आहे. विदर्भातही सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा कमी झाला आहे.