आताचा ट्रम्प यांचा भारत दौरा दोन्ही देशांच्या संबंधांना उत्तुंगतेच्या शिखरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका निभावेलच.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सहपरिवार दोन दिवसीय भारत दौरा नुकताच संपला. दौर्याच्या पहिल्या दिवशी गुजरातच्या अहमदाबादेत आयोजित ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाने अध्यक्षांचे स्वागत केले. उपस्थित अफाट जनसमुदायाच्या चेहर्यावरील उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणात इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दोन्ही नेत्यांनी भारत व अमेरिकेचे कौतुक करत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाने भारावलेल्या अध्यक्षांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी सरकारच्या दारिद्य्र निर्मूलन, घराघरात वीज, प्रत्येकाला घर, उज्ज्वला योजना, इंटरनेट जोडणी आदींचा उल्लेख केला. मोदींच्या नेतृत्वात भारत जगभरात शक्तिशाली देश म्हणून उभा राहत असल्याचे नमूद करत अमेरिका भारताचा निष्ठावान मित्र असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सोबतच कट्टर इस्लामी दहशतवादाचे नाव घेऊन ट्रम्प यांनी पाकिस्तानलाही योग्य तो संदेश दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या संबोधनात अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असल्याचे सांगत दोन्ही देश केवळ भारत-प्रशांत क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात शांतता, प्रगती आणि सुरक्षेसाठी योगदान देऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला. न्यू इंडिया आणि युवाशक्ती, सोलार पार्क, आयुष्मान भारत योजना, उपग्रह प्रक्षेपणातील भारताच्या घोडदौडीची माहिती यावेळी मोदींनी दिली. दरम्यान, येत्या वर्षभरात होणार्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीला सामोरे जाण्याआधी इतक्या भव्य प्रमाणावरील कार्यक्रमाने डोनाल्ड ट्रम्प यांना नैतिक पाठिंबा नक्कीच मिळेल. तसेच अमेरिकन नागरिक आणि तिथल्या भारतीय मतदारांच्या मनावरही ‘नमस्ते ट्रम्प’चा प्रभाव पडेल, असे वाटते.
अहमदाबादेतील स्वागताच्या कार्यक्रमानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आग्य्रातील ताजमहालला भेट दिली व नंतर द्विपक्षीय चर्चा, करार, वाटाघाटींसाठी दिल्लीत पाऊल ठेवले. जवाहरलाल नेहरूंपासून काँग्रेसच्या प्रत्येक पंतप्रधानाने परराष्ट्र संबंधात रशियाला सातत्याने अग्रक्रम दिला. परंतु, नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून भारतीय परराष्ट्र धोरणाचा लंबक वेगाने सरकू लागला आणि आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी अमेरिकेची साथ आवश्यक असल्याचे त्यांनी दाखवून दिले. डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा यामुळे अधिकच महत्त्वाचा झाला होता आणि त्याला अनुसरूनच दोन्ही देशांत संरक्षण-सुरक्षा, ऊर्जा, तंत्रज्ञान, जनसंपर्क आणि औषध उत्पादनविषयक करार करण्यात आले. भारतासारख्या पाकिस्तान व चीन या दोन कुरापतखोर शेजारी लाभलेल्या देशाला आपल्या सीमांची सुरक्षा करणे प्राधान्याचा विषय असतो. तसेच नक्षलवाद, माओवाद, फुटीरतावादी प्रवृत्तीही देशात कधी ना कधी डोके वर काढत असतात. सीमांची सुरक्षा असो वा अंतर्गत सुरक्षा यात बर्याचदा दुर्गम, पर्वतीय, डोंगराळ भागातही कारवाई करणे गरजेचे असते. परंतु, कित्येकदा अशा ठिकाणी रस्ते, रेल्वे वा विमानाने पोहोचण्यापेक्षा हेलीकॉप्टर्स अतिशय उपयुक्त ठरतात व संबंधित विभागांच्या हालचालीतही गतिमानता येते. अमेरिकेबरोबर करण्यात आलेला ‘रोमियो’ आणि ‘अपाचे’ हेलिकॉप्टर खरेदी करार म्हणूनच महत्त्वपूर्ण ठरतो. अमेरिकेचा यात जसा आर्थिक फायदा आहे, तसाच तो भारताचा सुरक्षा बळकटीकरणाचाही आहेच. ट्रम्प यांच्याबरोबर यावेळी मानसिक आरोग्य आणि औषध उत्पादन तथा वैद्यकीय उपकरणांशी संबंधित करारही करण्यात आले.
बदलत्या काळात व्यक्तीच्या मानसिक स्थितीतही मोठा बदल होत असून त्यातून अनेक समस्या निर्माण झाल्याचे सर्वत्र पाहायला मिळते, आता दोन्ही देश त्याचाच एकत्रितरित्या सामना करतील. औषध उत्पादन आणि वैद्यकीय उपकरणविषयक करारात सुरक्षेच्या मुद्द्याचा अंतर्भाव केलेला आहे. तसेच दोन्ही देशांचे माहितीच्या देवाणघेवाणीवरही मतैक्य झाल्याचे समजते, जेणेकरून आरोग्यक्षेत्रात सक्षम होता येईल. भारत व अमेरिकेतील तिसरा महत्त्वाचा करार म्हणजे ऊर्जाविषयक. भारताची उर्जेची गरज ही सारखी वाढत असून ती आयातीवरच अवलंबून आहे. आखाती देशांतून आयात केल्या जाणार्या खनिज तेल आणि नैसर्गिक वायुच्या पुरवठ्यावर भारतीय वाहने, उद्योग, कंपन्या चालतात. परंतु, अमेरिकेनेही गेल्या काही काळापासून आपल्या देशात उत्खनन सुरू केले असून भारताला त्या देशाकडूनही खनिज तेल, नैसर्गिक वायू हवे आहे. म्हणूनच अमेरिकेतील ‘एक्झॉन-मोबिल’ आणि ‘चार्ट इंडस्ट्रीज’ यांच्याशी इंडियन ऑईलने केलेला करार महत्त्वाचा ठरतो. भारतातील अनेक भागात काही कारणांमुळे नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठी पाईपलाईनची व्यवस्था नाही. नव्या करारानुसार मात्र अमेरिकन कंपनी अशा ठिकाणी रस्ता, रेल्वे वा जलमार्गाने नैसर्गिक वायूचा (एलएनजी) पुरवठा करेल.
दोन्ही देशांतील करारांवर स्वाक्षर्या झाल्यानंतर मोदी व ट्रम्प यांनी संयुक्त निवेदनही दिले. पाकिस्तानातून होणार्या दहशतवादी कारवायांचा निषेध करत डोनाल्ड ट्रम्प यांनी जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांची नावेही घेतली. तसेच पाकिस्तानने आपल्या जमिनीवरुन दहशतवादी कारवाया होऊ देऊ नये, असेही ते म्हणाले. तथापि, ट्रम्प यांना तालिबान-अफगाणिस्तान या झेंगाटातून लवकर बाहेर पडायचे असल्याने त्यांना तिथे पाकिस्तानचे साहाय्य हवे आहे. तसेच पाकिस्तान चीनच्या कह्यात जाऊ नये, म्हणूनही डोनाल्ड ट्रम्प पुरेसे प्रयत्नशील आहेत. म्हणूनच त्यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल वगैरे केल्याचे दिसले नाही आणि त्यात काही वावगेही नाही. ट्रम्प यांनी यावेळी चीनचाही उल्लेख केला आणि दक्षिण चीन समुद्रात आचारसंहितेचे पालन करणे गरजेचे असल्यावर जोर दिला. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार समुद्रावरील सर्व देशांच्या वैध अधिकार व हितांना धक्का देणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले. दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या वाढत्या प्रस्थाच्या पार्श्वभूमीवर भारतीय भूमीवरून ट्रम्प यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वाचेच.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौर्याआधी ते भारतातील धार्मिक स्वातंत्र्यावर बोलणार म्हणून डाव्या-पुरोगामी कळपाने एक निराळेच वातावरण तयार केले होते. अमेरिकेतील काही संस्थांच्या अर्धवट माहितीवरील धर्मस्वातंत्र्यविषयक अहवालाची पार्श्वभूमी त्याला होती. मोदी किंवा भाजप सरकारवर धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून ट्रम्प टीका करतील वा कानपिचक्या देतील, अशीही या टोळीला अपेक्षा होती. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात सर्वाधिक धार्मिक स्वातंत्र्य असून देशातील मुस्लिमांची लोकसंख्या १४ कोटींवरून २० कोटींवर वाढल्याचा दाखलाही यावेळी दिला. सोबतच नागरिकत्व सुधारणा कायद्यावरही मतप्रदर्शन न करता हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे सांगत आशावादी धेंडांना चडफडण्याची संधी दिली. ट्रम्प यांच्या दौर्याआधी दोन्ही देशांत द्विपक्षीय व्यापार करार होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते, त्यामुळे तो यावेळी झाला नाही. परंतु, मोदींनी म्हटल्याप्रमाणे त्यावर काम सुरू आहे आणि कदाचित ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यावर तसा व्यापारी करार होईलही. तरीही आताचा ट्रम्प यांचा भारत दौरा दोन्ही देशांच्या संबंधांना उत्तुंगतेच्या शिखरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका निभावेलच.