मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच औरंगाबाद दौरा केला. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पराभवानंतर त्यांनी वैजापूर येथील चिंतन बैठकीला हजेरी लावली होती. वैजापूरला येताना सुप्रिया ताईंना रस्त्यावरचे खड्डे दिसले नाही का, असा सवाल भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. "सुप्रिया सुळे यांना प्रवासादरम्यान रस्त्यावरील खड्डे दिसले नाही का? भाजप सरकारच्या काळात जिथे जाईल तिथे रस्त्यावरच्या खडड्यांचा सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकणाऱ्या सुप्रिया सुळेंनी आता रस्त्यावरील खड्ड्यांचा सेल्फी का नाही घेतला नाही?," असा सवाल भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे यांनी केला केला आहे.
"शिवसेनेने जनादेशाचा अपमान करून सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला. तीन पक्षांची महाविकास आघाडी नसून महाराष्ट्र भकास आघाडी आहे," अशी खोचक टीका दांगोडे यांनी केली. तसेच पुढे त्यांनी कर्जमाफीवरून देखील ठाकरे सरकारवर टिकास्त्र सोडले. "सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे ते म्हणाले. दरम्यान सरकारच्या अकार्यक्षमतेचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्या नेतृत्वात मंगळवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.