मुंबई : राज्यामध्ये बळीराजाची अवस्था बिकट झालेली आहे. महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत, असे असताना शेतकऱ्यांना न्याय देण्यास आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यास असमर्थ ठरलेल्या सरकारचा पर्दाफाश करणार असल्याची ठाम भूमिका विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मांडली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण दरेकर आणि भाजपच्या इतर सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा जाहीर निषेध दर्शविला.
प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, "शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असे सांगून ठाकरे सरकारने त्यांची घोर फसवणूक केली आहे. हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यास व त्यांच्या विविध हक्कांसाठी लढण्यास असमर्थ ठरले आहे. राज्यात महिलांच्या अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्यामुळे राज्यातील महिला असुरक्षित आहे. महिलांच्या मनात भीतीचे वातावरण आहे." हे आणि जनतेचे विविध प्रश्न दोन्ही सभागृहांमध्ये ताकदीने मांडणार व ठाकरे सरकारचा पर्दाफाश करणार असल्याची प्रखर भूमिका दरेकर यांनी मांडली आहे.