अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात पाऊण तास चर्चा
नवी दिल्ली : "नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (सीएए) कोणीही घाबरण्याची गरज नाही. कोणालाही देशातून बाहेर काढण्यासाठी हा कायदा नाही. सीएएवरून आंदोलन भडकविणाऱ्यांनी प्रथम कायदा व्यवस्थितपणे समजून घ्यावा. त्याचप्रमाणे एनआरसी आणि एनपीआर लागू झाल्यानंतर त्याविषयी बोलू," अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. त्यामुळे आता शिवसेनेचा सीएएविरोध मावळला असल्याची चर्चा राजकारणात सुरू झाली आहे. दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी पाऊण तास चर्चा झाली. शिवसेनेचा मावळता विरोध हा त्यांच्या मित्र पक्षांसाठी इशारा मानला जात आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत राज्याचे पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात सुमारे पाऊण तास चर्चा झाली. पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत त्याविषयी माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य सचिव अजोय मेहता आणि उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सीएए, एनआरसी आणि एनपीआर या विषयावर सविस्तर चर्चा झाली. "सीएएविषयी देशात विनाकारण भयाचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे, मात्र त्यावरून कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण हा कायदा कोणालाही देशातून बाहेर काढण्यासाठी नाही. भारताच्या शेजारी देशातील धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणारा हा कायदा आहे. त्यामुळे सीएएविरोधात आंदोलन भडकविणार्यांेनी प्रथम तो कायदा व्यवस्थितपणे समजून घ्यावा," असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
महाराष्ट्रातील एकाही नागरिकाचे हक्क हिरावून घेतले जाणार नाही, असे आश्वासन आपण दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, "एनपीआर ही जनगणनेसोबत दर दहा वर्षांनी होणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे त्यात आक्षेपार्ह असे काहीही नसून त्याची आवश्यकताच आहे. त्याचप्रमाणे एनपीआरदेखील कोणालाही देशाबाहेर काढण्यासाठी नाही. एनपीआरची प्रश्नावली अद्याप समोर आलेली नाही, प्रश्नावली आल्यानंतर त्यात काही आक्षेपार्ह असे आढळल्यास त्यावर तेव्हा चर्चा करता येईल."
एनआरसी अद्याप देशभरात लागू करण्यात येणार नसून सध्या तो केवळ आसामपुरताच असल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसची सीएएविषयीची भूमिका भिन्न असली तरी त्यांच्यासोबत शिवसेेनेची चर्चा सुरू असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, यानंतर ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व लालकृष्ण अडवाणी यांचीही भेट घेतली.
आमचे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार!
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात पाच वर्षे पूर्ण करणार, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आपण दिल्लीत आलो असून पंतप्रधानांची भेट घेतल्याचे ते म्हणाले. राज्याशी संबंधित सर्व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली, राजकीय मतभेद बाजूला ठेवून केंद्र सरकारने मदत करावी, अशी विनंती पंतप्रधानांना केली. "राज्य सरकारसोबत समन्वय साधून सर्व प्रकारचे सहकार्य केंद्रातर्फे करण्यात येईल," असे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे ठाकरे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जीएसटीचा राज्याच्या वाट्याचा परतावा लवकरात लवकर मिळावा. पंतप्रधान पीकविमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि राज्य सरकारतर्फे मार्चपासून राबविण्यात येणार्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेसह अन्य विषयांवरही चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्याचप्रमाणे राज्यापालांसोबत कोणत्याही प्रकारचा संघर्ष अथवा वाद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि अखेरीस देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा ?
शिवसेनेने यापूर्वी नागरिकत्व सुधारणा कायद्यास विरोध करण्याची भूमिका घेतली होती. विशेष म्हणजे सीएएला लोकसभेत पाठिंबा देण्याची आणि राज्यसभेत मात्र विधेयकाच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याची अनाकलनीय भूमिका घेतली होती. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील अन्य दोन घटक पक्षांचा- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सीएएला विरोध आहे. मात्र, पंतप्रधानांच्या भेटीनंतर शिवसेनेचा सीएएविरोध मावळला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सीएएवरून आंदोलन भडकविणार्यांानी प्रथम कायदा व्यवस्थितपणे समजून घ्यावा, हा मुख्यमंत्र्यांचा टोला आपल्या नव्या मित्रांसाठी तर नव्हता ना?, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.