मुख्यमंत्र्यांचे सीएएला समर्थन
नवी दिल्ली : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दाखल झाली. यावेळी सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यांसह अनेक प्रश्नांवर चर्चा झाली असून सीएएला घाबरण्याची काहीच गरज नसल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत व्यक्त केले. सीएए हा कायदा नागरिकत्व हिरावण्याचा कायदा नसून देशाबाहेरील पीडित हिंदूंना न्याय आणि नागरिकत्व देणारा कायदा आहे, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, "नागरिकत्व कायदा, एनआरसी यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक मुद्द्यांवर पंतप्रधानांसोबत चर्चा झाली. जीएसटीतील सवलत, पंतप्रधान पीक विमा योजना यांच्यासह अन्य प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सकारात्मक संकेत मिळाले", अशी माहिती त्यांनी दिली. राज्य कारभार सुरळीत चालावा, केंद्र आणि राज्यातील प्रशासनात समन्वय राहावा यासाठी या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.
कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत या भेटीबद्दल विस्तृत माहिती दिली आहे. पर्यावरण समस्या, इलेक्ट्रीक वाहने, बळीराजा संजिवनी योजना, पीएमसी बॅंक प्रकरण, उर्जेच्या नवनिर्मिती आदी मुद्द्यांसंदर्भात मोदींच्या भेटीत चर्चा झाली, असे आदित्य म्हणाले.