मुंबई(विशेष वृत्त) : कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी दुर्दैवी हिंसाचार झाला होता. तपासादरम्यान एल्गार परिषद व त्याचे माओवादी धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीसाठी मा. न्यायमूर्ती जयनारायण पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग गठीत करण्यात आला आहे. आयोगासमोर शरद पवार यांची गेल्या वर्षी साक्ष झाली आहे. पवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कोणताही उल्लेख करण्यात आला नव्हता. मात्र दोन दिवसांपूर्वी पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भिडे-एकबोटे यांच्यावर आरोप केले. तसेच सध्या अटकेत असलेल्या व हिंसाचाराचे आरोप असलेल्या माओवाद्यांची पाठराखण केली होती.
जानेवारी २०१८ च्या दरम्यान शरद पवार हीच भूमिका घेत होते. त्यानंतर पवारांनी आपले वक्तव्य वेळोवेळी बदलले. मात्र आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करताना त्यांनी कोणावरही आरोप किंवा कोणाचीही पाठराखण केली नव्हती. गेले काही दिवस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आरोपींची पाठराखण करताना दिसतात. त्या अनुशंगाने १८ फेब्रुवारी २०२० रोजी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषदेत पवारांनी केलेल्या वक्तव्याची दखल विवेक विचार मंचाचे सागर शिंदे यांनी घेतली आहे. पवारांकडे असलेली अतिरिक्त माहिती चौकशी आयोगाला मिळाली पाहिजे व त्याकरिता शरद पवारांच्या नावे समन्स काढण्यात यावेत, असा विनंती अर्ज चौकशी आयोगाला देण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार ठोस भूमिका घेणारे प्रतिज्ञापत्र आयोगासमोर सादर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.