नवी दिल्ली : हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्यासारखी प्रक्षोभक वक्तव्ये अनेकवेळा एमआयएमच्या नेत्यांकडून झाली आहेत. यावेळी एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी खळबळजनक विधान केले. "लक्षात ठेवा, १५ कोटी आहोत पण १०० कोटींवर भारी आहोत" असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. कर्नाटकतील गुलबर्गा येथे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्यावेळी १५ फेब्रुवारीला हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. महत्त्वाचे म्हणजे एमआयएमचे खासदार आणि अध्यक्ष असदुद्दीन ओवेसीदेखील उपस्थित होते.
"केवळ शब्दांनी उत्तर देता येणार नाही, विटेला दगडाने उत्तर देणे आपण शिकलो आहोत. मात्र, एकत्र होऊन चालावे लागेल. स्वातंत्र्य घ्यावे लागेल व जी गोष्ट मागितल्याने मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागेल. हे लक्षात असू द्या. आता वेळ आली आहे, आम्हाला म्हणाले महिलांना पुढे केले. आता तर फक्त वाघिणी बाहेर निघाल्या आहेत, तर तुम्हाला घाम फुटला. मग विचार करा आम्ही सोबत आलो तर काय होईल. १५ कोटी आहोत पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा." असे वादग्रस्त वक्तव्य पठाण यांनी यावेळी केले आहे. यावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका करत सांगतले की, " कारण नसताना अशा पद्धतीने भाष्य करणारे १०० कोटी लोकांनाच अवमान करतात. अशी चिथावणीखोर वक्तव्य करून आम्ही पराक्रमी आहोत असे दाखवण्याचे कारण नाही. अशी वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत." असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.