नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत शाहीन बाग आंदोलन केंद्रस्थानी रविवारी सकाळी शाहीन बाग परिसरात पुन्हा आंदोलन झाले. मात्र, हे आंदोलन शाहीन बाग आंदोलकांविरोधात होते. रस्ते खुले करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली. आंदोलन करणारे बहुतांश लोक परिसरातील असल्याचे कळते. नागरिकत्व कायदा, सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरु झालेल्या या आंदोलानाला राजकीय वळण लागल्याने हे आंदोलन अद्याप सुरुच आहे. यादरम्यान महत्वाचे रस्ते बंद झाल्याने या नागरिकांना गेल्या ५० दिवसांपासून त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
आंदोलनात सहभागी झालेले नागरिकांनी आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही, असे सांगत आहेत. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर सर्व नागरिकांनी धरणे धरले. तसंच घोषणाबाजी करत होते. पोलीस अधिकारी चिन्मय बिस्वास हे देखील घटनास्थळी पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, शाहीन बाग आंदोलकांपासून हे लोक ३०० मीटर अंतरावर आहेत. आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये फरीदाबाद, बागपत, वल्लभगड येथूनही आलेले नागरिक आहेत. आंदोलनामुळे आम्हाला काहीच त्रास नाही, पण रस्ते खुले झाले पाहिजेत. रामलीला मैदान किंवा जंतर मंतर येथे जाऊन आंदोलन करावे, असे या आंदोलकांचे म्हणणे आहे.