'पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळून देशद्रोही भूमिका घेणाऱ्यांची फेरचौकशी करावी'
मुंबई : मुंबई पोलीस दलाचे निवृत्त पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये कसाबला हिंदू दहशतवादी म्हणून दाखवण्याच्या संदर्भातला जो खुलासा केला आहे, या पार्श्वभूमीवर २६/११च्या संपूर्ण प्रकरणाची फेरचौकशी करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच हिंदू दहशतवादाचा बनाव रचत पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळन देशद्रोही भूमिका घेणाऱ्या काँग्रेस नेत्यांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली.
कॉंग्रेस नेत्यांच्या खोट्या प्रचारामुळे कसाबला हिंदू दहशतवादी ठरविण्याचा प्रयत्न
ते पत्रात म्हणतात कि, मुंबई शहरावर २६/११ चा आतंकवादी हल्ला झाल्यानंतर या हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे या सगळ्यांना कसाबने मारलेले नसून हिंदू दहशतवाद्यांनी मारले अशा प्रकारचा प्रचंड खोटा आणि गलिच्छ प्रचार देशातील त्यावेळच्या काँग्रेसच्या नेत्यांनी व काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी केला होता ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे आयएसआय ही दहशतवादी संघटना कसाबला हिंदू दहशतवादी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत होती. हा तत्कालीन पोलिस आयुक्तांचा खुलासा आहे. त्याच वेळेला या देशातले काही लोक या संदर्भाच्या दिशेने लिखाण करत होते आणि तशा प्रकारच्या मागण्या करत होते हे अत्यंत धक्कादायक असून राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित असे हे प्रकरण आहे. त्यामुळे या सर्व लोकांची या संदर्भातली सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
तत्कालीन सरकारने सादर केलेला राम प्रधान समितीचा अपूर्ण अहवाल विधिमंडळासमोर
या हल्ल्याची चौकशी करण्याच्या संदर्भात तत्कालीन सरकारने निवृत्त गृहसचिव राम प्रधान यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती. या समितीचा अहवाल हा तत्कालीन सरकारने विधिमंडळासमोर पूर्णपणे सादर केला नव्हता. २६/११ च्या हल्ल्याला १० वर्ष पूर्ण झाल्यानंतर हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्वतः राम प्रधान यांनी हे मान्य केले आहे की, त्या हल्ल्यामध्ये जे लोकल कनेक्शन मिळत होते ते लोकल कनेक्शन तुम्ही उघड करू नका, अशा प्रकारचा आदेश तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आपल्याला दिला आणि हे सुद्धा या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर तत्कालीन राज्य सरकारच्या एका काँग्रेसच्या वरिष्ठ मंत्र्यांनी सुद्धा त्या वेळेला हा जाहीर आरोप केला होता की, या हल्ल्यामध्ये काँग्रेसचेच नेते सहभागी आहेत. त्याचबरोबर केंद्रातल्या एका काँग्रेसच्या मंत्र्यांनी सुद्धा २६/११चा हल्ला हा हिंदू दहशतवाद्यांचा कट आहे अशा प्रकारचा आरोप केला होता.
कालबद्ध मर्यादेमध्ये पुन्हा तपास करावा
या सर्व बाबींमुळे २६/११ च्या आतंकवादी हल्ल्याचा, ज्याच्यामध्ये मुंबई शहरातील दोनशेपेक्षा अधिक लोकांचा बळी गेला, अनेक पोलिस अधिकारी शहीद झाले अशा सर्व प्रकरणाचा या दृष्टिकोनातून तातडीने कालबद्ध मर्यादेमध्ये तपास करावा व पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळन देशद्रोही भूमिका घेणाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी भातखळकर यांनी पत्राद्वारे केली. कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्तास्थापन झाल्यानंतर वारंवार भूमिका बदलणाऱ्या शिवसेनेचे २६ ११ हल्ल्यांबाबत झालेल्या खुलास्यावर मुख्यमंत्र्यांची भूमिका काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.