मुंबई : ‘महाराष्ट्र पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करून शरद पवार कर्तव्यदक्ष पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याच्या प्रयत्नांत आहे,’ अशी टीका भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली. दरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भीमा कोरेगाव व एल्गार परिषद प्रकरणात तपास करणाऱ्या पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. यावरून भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले. दैनिक मुंबई तरुण भारताशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
भंडारी म्हणाले, “पोलिसांनी एल्गार आणि कोरेगाव भीमा या प्रकरणांचा योग्य तपास करून सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर केले. यामुळेच याप्रकरणातील आरोपींचा जामीन मंजूर करण्यात आला नाही, असे असताना शरद पवार पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. शरद पवारांचा हा महाराष्ट्र पोलिसांना ठरवून लक्ष्य करण्याचा प्रकार चुकीचा आहे,” अशी टीका भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली.
आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे माध्यम प्रतिनिधींशी एल्गार परिषदेसंदर्भात संवाद साधून यांसंदर्भातील भूमिका शरद पवार यांनी पोलिस दलाला लक्ष्य केले. ते म्हणाले,भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा तपास एनआयकडे दिला गेला आहे, तो केंद्राचा अधिकार आहे. परंतु भीमा कोरेगाव किंवा एल्गार परिषदेची चौकशी व्हावी, ही आमची मागणी नाही, तर पोलिस दलाचा याप्रकरणी ज्यापद्धतीने गैरवापर झाला आहे, त्याची चौकशी व्हायला हवी. या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार राज्य सरकारलाही आहे. पुणे पोलिसांनी जो तपास केला त्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलाच्या लौकिकाला धक्का बसला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस आणि पुणे पोलिसांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच एल्गार परिषदेची समांतर चौकशी राज्य सरकार करणार असल्याचेही स्पष्ट केले.
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी कोरेगाव भीमा प्रकरण व एल्गार परिषदेबाबत न्यायालयाचा निर्णय अंतिम असेल असे स्पष्ट केले. तसेच याप्रकरणातील आरोपी वेगवेगळ्या न्यायालयात आपली भूमिका मांडत होते, परंतु तरीही त्यांना अजूनही दिलासा नाही. हे केवळ चौकशीतून समोर आलेल्या पुरव्यांमुळे. त्यामुळे याप्रकरणात न्यायालयाचा निर्णय अंतिम असेल, असे दैनिक मुंबई तरुण भारताशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले.