मुंबई : ‘एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरण हे दोन्ही ही वेगळे नसून एल्गार परिषदेचे पडसाद भीमा कोरेगावमध्ये पाहायला मिळाले होते. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांची चौकशी एकत्रितच होईल. तसेच भीमा कोरेगाव प्रकरणाची तपासणी राज्य सरकारच करणार अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका केवळ राजकीय दबावापोटी असे,’ असे म्हणत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. दैनिक मुंबई तरुण भारताशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
दरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले, “केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास स्वत:कडे घेतला आहे. भीमा कोरेगाव हिंसाचाराचा तपास काढून घेतलेला नाही. माझ्या दलित बांधवाचा जो विषय आहे तो भीमा कोरेगावबाबत आहे आणि भीमा कोरेगावचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही, तो केंद्राकडे देणार नाही,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली.
एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने एएनआयकडे सोपविल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची बैठक पार पडली होती. त्यात एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा प्रकरणावर चर्चा झाली. यावरून शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चेला उधान आले होते. त्यांनतरच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिले.
यावर बोलताना भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले, "भीमा कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आज जी भूमिका मांडली त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. यामागचे त्यांचे तर्कशास्त्र नेमके काय? हा मुद्दा याठिकाणी उपस्थित होतो. उद्धव ठाकरेंनी तपासाबाबत आपली भूमिका का बदललेली यामागची कारणे पहिली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दैनिक मुंबई तरुण भारताशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार स्थापनेनंतर शरद पवारांनी सर्वप्रथम एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसाचाराची चौकशी एसआयटीमार्फत करावी अशी मागणी केली. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एसआयटीची मागणी केली होती,पण त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या निर्णयासह या प्रकरणाचा तपास राज्य सरकारकडून एनआयएकडे सोपविला. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेत मतभेद असल्याचे दिसून आले.