नवी दिल्ली : केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाने चिकण खाणे सुरक्षित असल्याचा खुलासा केंद्र सरकारने केला आहे. चिकनमुळे कोरोना विषाणू पसरत असल्याचा कोणताही पुरावा समोर पुढे आला नसल्याचे पशुसंवर्धन मंत्रालयाने सांगितले आहे. पशुसंवर्धन मंत्रालयाचे आयुक्त प्रविण मलिक यांनी कुक्कुटपाल महामंडळाचे सल्लागार विजय सरदाना यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी चिकनमधून माणसांमध्ये कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे जगभरात कुठेही आढळले नसल्याचे सांगितले आहे.
सरदाना यांनी या संदर्भात ई-मेलवरून प्रविण मलिक यांना प्रश्न विचारला होता. जागतिक प्राणी आरोग्य संस्थेच्या माहितीनुसार कोरोना विषाणुचा केवळ माणसातून माणसांना संसर्ग होतो. कोरोनाचा संसर्ग होताना कोणत्याही प्राण्याचा स्त्रोत आढळलेला नाही. कोरोनाप्रमाणे सार्स हा संसर्गजन्य रोग २००२-०३ मध्ये जगभरात पसरला होता. त्यावेळी कुक्कुटपालन आणि कुक्कुटपालन उत्पादनामधून सार्सचा संसर्ग होत नसल्याचे आढळून आले होते. कुक्कुटपालन आणि कुक्कुटपालनाच्या उत्पादने ही सुरक्षित आहेत. असे असले तरी जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक प्राणी आरोग्य संस्थेच्या सूचनांप्रमाणे मुलभूत स्वच्छतेच्या तत्वांचे पालन करण्याची गरज आहे.