नवी दिल्ली : "देशाची अर्थव्यवस्था संकटात नाही. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे. देशाची वाटचाल ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्थेकडे होत आहे." असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. लोकसभा आणि राज्यसभा येथे अर्थसंकलप २०२०-२०२१च्या प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी स्वतःच्या शैलीत उत्तरे दिली.
"केंद्र सरकारने थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढविले आहे. कारखान्यातील उत्पादनात वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यात वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन १ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. ही मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याची चिन्हे आहेत. अर्थव्यवस्था सुधारली असल्याची माहिती सात महत्त्वाच्या निर्देशकामधून दिसत आहे." अशी माहिती राज्यसभेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करताना दिली. तसेच पुढे त्या म्हणाल्या की, "शेअर बाजार निर्देशांक वधारत आहे. तर विदेशी चलनाची गंगाजळीचा आजपर्यंतचा सर्वोच्च विक्रम आहे. खासगी गुंतवणूक, निर्यात, खासगी आणि सार्वजनिक उपभोक्ततामध्ये वाढ या चार विकासाच्या इंजिनवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे."
"सरकारी गुंतवणुकीबाबत राष्ट्रीय पायाभूत पाईपलाईन योजनेची डिसेंबरमध्ये सरकारने घोषणा केली होती. येत्या चार वर्षात १.०३ लाख कोटी रुपये पायाभूत विकासांवर खर्च करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने वर्ष २०१९-२० साठी रब्बी आणि खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे." असेदेखील त्या म्हणाल्या. पुढे "संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात वित्तीय तुटीचे प्रमाण अधिक होते. तेव्हा अर्थव्यवस्था ही पात्र डॉक्टरांकडून हाताळली जात होती," असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षांना लगावला. नुकतेच माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी देशाची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या स्थितीमध्ये असल्याचे वक्तव्य केले होते. तर, अपात्र डॉक्टरांकडून रुग्णाला पाहिले जाते असल्याची टीका चिदंबरम यांनी केली होती.