नवी दिल्ली : ३२४ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान चीनमधील वुहान येथून निघाले होते. जे आता दिल्लीत पोहचले आहे. या नागरिकांना भारतात आणल्यावर तातडीने घरी पाठवण्यात येणार नाही. या सगळ्या रुग्णांसाठी भारतीय लष्कराने हरयाणा येथील मानेसरमध्ये तात्पुरते रुग्णालय उभारले आहे. या ठिकाणी ३०० जणांची राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. चीनमधून येणाऱ्या नागरिकांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या सगळ्यांना मानेसर येथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार आहे.
चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन आत्तापर्यंत २५९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११ हजारांपेक्षा जास्त लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. या गंभीर परिस्थितीतून चीनमधल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी एअर इंडियाने एक विशेष विमान वुहानला पाठवले होते. कोरोना व्हायरसचा भारतातला पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला. एका विद्यार्थ्याला या विषाणूची लागण झाली. हा विद्यार्थी वुहान येथून परतला होता. त्याला आता वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. ही घटना समोर आल्यानंतर एअर इंडियाने एक विशेष विमान चीनमधील वुहानला पाठवले होते. या विमानातून ३२४ भारतीय हे आज दिल्लीत दाखल झाले आहेत.