नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या सकाळी ११ वाजता २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली आहे. ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असून विमा योजनेतून शेतकऱ्यांना लाभ मिळतो आहे. ‘किसान रेल योजना’ सुरू करून दूध, मांस, मासे वाहतूक करणे अधिक सोपे करणार’,अशी घोषणाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली.
‘अन्नदाता उर्जादाता बनवण्यावर आम्ही भर देणार आहोत. जलसंकटात असलेल्या १०० जिल्ह्यांना अर्थसहाय्य देणार आहोत तसेच शेत जमिनींचा वापर चांगल्या पद्धतीने करुन अधिक उत्पन्न कसे घेता येईल यावर सरकारचा भर असणार आहे,’ असेही निर्मला सीतारामण यांनी सांगितले.
‘प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहचवण्यात यश आले आहे. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत करावी लागेल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत असेही निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांसाठी आम्ही १६ कलमी कार्यक्रम सुरु करत आहोत, ज्याद्वारे शेतकऱ्यांची प्रगती साधण्यावर भर दिला जाईल. सौर उर्जेवर शेती पंप सुरु केले आहेत. आणखी १५ लाख शेतकऱ्यांना सोलार पंप देणार',असेही त्यांनी जाहीर केले.