‘लॉकडाऊन’ च्या काळामध्ये झोपडपट्टी परिसरातील गरीब, कामगार तसेच गरजू, अत्यावश्यक सेवा देणार्यांच्या पाठीशी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १९चे नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी समाजाप्रतिची माणुसकी तर जपलीच, शिवाय मास्क, सॅनिटायझर, औषधांचे वितरणही केले. तसेच प्रभागामध्ये गरजवंतांना प्रत्येक ठिकाणी मदत केली. त्यांच्या कोरोना काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा लेख...
शीतल उर्फ विजय शिंदे
राजकीय पक्ष : भाजप
पद : नगरसेवक
प्रभाग क्रमांक :१९, श्रीधरनगर, पिंपरी-चिंचवड
संपर्क क्र. : ९८५०९०५०३३
कोरोना नावाच्या विषाणूची संक्रमण अवस्था भारतात सुरू झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली. पहिला प्रश्न पडला तो घराबाहेर पडायचे की नाही, पडायचे असेल तर त्याच्या मार्गदर्शक सूचना ज्या होत्या त्या शासकीय अधिकार्यांकडून प्रथम समजून घेतल्या. त्यामध्ये शीतल शिंदे यांना नगरसेवक म्हणून काम करण्यासाठी पास मिळाला. लॉकडाऊन’च्या तिसर्या दिवसापासून शीतल शिंदे यांच्या कार्यालयात फोन सुरू झाले. रोजंदारीवर काम करणार्या लोकांच्या घरी रेशन संपले आहे, गॅस संपला आहे, अशा अडचणी उभ्या राहिल्या. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. प्रत्येकी एक-एक महिन्याचे रेशन नगरसेवक शीतल शिंदे यांनी आपल्या माध्यमातून घरपोच वाटप केले. ‘कोरोना योद्धे’ म्हणून शीतल शिंदे यांचे सहकारीही पुढे आले. त्यांचे पास महापालिकेकडून बनवून घेतले.
स्वयंसेवकांनी तातडीने वयोवृद्ध नागरिकांना औषधे पोहोचविण्याची व्यवस्था करून दिली. मजूर, कामगार ज्यांचे कोणीच नाही, अशा लोकांची जेवणाची सोयही केली. स्वतः शीतल शिंदे उभे राहून त्यांच्या जेवणाची व्यवस्था पाहत होते. प्रसंगी स्वतः जेवणाची पाकिटे भरीत होते.पहिल्या दिवशी २०० जेवणाची पाकिटे वाटप झाली, नंतर यामध्ये वाढ होऊन दिवसाला दोन हजार पाकिटांचे वाटप करण्यात आले.कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर शीतल शिंदे यांच्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन औषध फवारणी करण्यात आली, ज्यांना कोरोना झाला, त्यांना बेड मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत शीतल शिंदे यांनी केली. शक्य तेवढ्या लोकांना मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव आनंदनगरच्या झोपडपट्टी वसाहतीमध्ये वाढला. मग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून तो भाग बंद करण्यात आला. त्या परिसरातील लोकांचे हाल होत असल्याची माहिती मिळाली. मग त्या ठिकाणी दूध, जेवण व अन्य गोष्टी पुरविण्याचे काम स्वयंसेवकांनी केले.
मी अगदी सामान्य जनतेतून निवडून आलो आहे. मला लोकांसाठी काम करायचे आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सर्व काही लोकांसाठी, समाजकार्यासाठी, जेवढे शक्य असेल तेवढे काम मी निष्ठेने करणार आहे. देवाचा आशीर्वाद आणि लोकांचे प्रेम हेच माझे भांडवल आहे. सर्व काम हे लोक समर्पित आहे.
आनंदनगरच्या झोपडपट्टी वसाहतीमध्ये एक प्रसंग घडला. तो म्हणजे, त्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक क्षेत्र जाहीर केल्यानंतर विद्रोही लोकांनी उठाव केला. त्या ठिकाणी मारामारीचा प्रसंगदेखील ओढावला. पोलिसांच्या सहकार्याने शीतल शिंदे यांनी मध्यस्थी करून त्यांची समजूत घालून तो प्रसंग यशस्वीरीत्या हाताळला. त्यांच्या ज्या अडचणी असतील त्या समजून घेतल्या आणि त्यावर मार्ग काढला. त्या ठिकाणी मदत करून लोकांचे प्रश्न मार्गी लावले. पिंपरी-चिंचवडमधील आयुक्तांच्या चर्चेनंतर पुण्यातील नावाजलेली ‘साधू वासवानी मिशन संस्था’ आहे. त्यांच्या सहकार्याने बर्याच कुटुंबांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली. त्या सर्वांचे आभार शीतल शिंदे यांनी मानले. कोणी कोरोना पेशंट असेल, त्यांना धीर देऊन त्यांना योग्य ते औषधोपचार मिळावे, यासाठी डॉक्टरांना लागेल ती मदत शीतल शिंदे यांच्यामार्फत करण्यात आली.‘लॉकडाऊन’ काळामध्ये ज्यांची गावी जाण्याची सोय नव्हती, त्यासाठी पासेस मिळवून देणे त्यांची पूर्ण व्यवस्था करण्याचे कामदेखील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आले. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप याबद्दल मला प्रचंड आपुलकी आहे,” असे सांगत, “आपले कामच सर्वसामान्यांसाठी आहे. शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी दिवस-रात्र आम्ही मदतीसाठी तत्पर आहोत,” असेही शीतल शिंदे सांगतात.
गणेशोत्सवाच्या काळामध्ये महापालिकेने घाटावर विसर्जन करण्यासाठी कोरोनामुळे प्रवेशबंदी केली होती. शीतल शिंदे यांच्या संकल्पनेतून चालते-फिरते दहा रथ बनवून त्यामध्ये जलकुंड, निर्माल्य कुंड, असे स्वतंत्र बनवून घेण्यात आले होते. प्रत्यक्ष लोकांच्या दारी जाऊन त्यांचे गणपती घेऊन यात विसर्जित करण्यात आले. जवळपास आठ हजार गणपती विसर्जित करण्यात आले. कोरोना मृतदेहांची विल्हेवाट लावणार्यांच्या हस्ते या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे, हा त्यामागचा उद्देश होता.दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांना शिंदे यांच्यातर्फे बक्षीस देण्यात येते. सामुदायिक विवाह सोहळ्यांसारखे विविध उपक्रम त्यांच्यामार्फत घेतले जातात. कोरोनाकाळात जेवढ्या लोकांना मदत केली, त्या सगळ्यांमध्ये कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे सर्व शक्य नव्हते. प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ता सामान्य जनतेच्या मदतीसाठी धावून जायचा, त्यामुळेच हे सर्व काही शक्य झाले आहे.
- सुशील कुलकर्णी