आपल्याला प्रभागातील नागरिकांनी विश्वासाने निवडून दिले आहे. त्यामुळे संकटकाळात त्यांना मदत करणे हे आपले परम कर्तव्य आहे, ही जबाबदारी लक्षात घेता, माने दाम्पत्याने या कार्यात स्वत:ला अक्षरश: झोकून दिले. प्रभाग क्र. ३ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी एकूण २३८ किलोमीटरच्या संपूर्ण परिसरात त्यांनी ‘हायकलो क्लोराईड’ या औषधाची दोन वेळेस फवारणी केली. तसेच, तीन हजार ‘एन-95 मास्क’चे वाटप त्यांनी केले. २२० थर्मल स्कॅनर मशीन आणि सात हजार ‘आर्सेनिक अल्बम-30’च्या गोळ्यांचे देखील त्यांनी वाटप केले. ‘हायकलो क्लोराईड’ या औषधाच्या पाच लीटरच्या ३०० कॅनचे वाटप प्रभाग क्र. ३ मधील नागरिकांना करण्यात आले. प्रभाग क्र. ३ हा ‘हाय कॉन्टॅक्ट झोन’ जाहीर केला होता. त्या परिसरात माने व नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने तेथील नागरिकांची ‘रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट’ आजही मोफत केली जात आहे व ‘पॉझिटिव्ह’ आलेल्या नागरिकांना सीडीओ मेरी येथील ‘कोविड सेंटर’मध्ये योग्य ते औषधोपचार उपलब्ध करून देण्याचे कार्य आजही अविरत सुरू आहे.
दि.२२ जुलै, २०२० पासून माने यांच्या संपर्क कार्यालयामध्ये रोज १०० ते १५० नागरिकांची ‘रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट’ची मोफत सुरुवात त्यांनी केली. कालांतराने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ९ ऑगस्ट, २०२० रोजी त्यांनी त्यांचे संपर्क कार्यालयच चक्क ‘फिवर क्लिनिक’ म्हणून घोषित केले. आजपर्यंत त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये दररोज किमान १०० नागरिकांची ‘रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट’ मोफत करण्यात येत आहे. तसेच, त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये १२ हजार ते १३ हजार नागरिकांची ‘रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट’ मोफत करण्यात आली आहे. १६ हजारांच्या पुढे नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. ‘पॉझिटिव्ह’ असलेल्या नागरिकांना ‘कोविड सेंटर’ला घेऊन जाणे, त्या ‘पॉझिटिव्ह’ आलेल्या नागरिकांना ‘कोविड सेंटर’ला अॅडमिट करणे, त्यांच्यावर योग्य ते औषधोपचार करणे व त्यांची प्रकृती व्यवस्थित झाल्यानंतर त्यांना पुन्हा आपल्या घरी सुखरूप घेऊन येणे, या सर्व सेवा त्या बजावत आहेत. बहुतेक नागरिक ‘पॉझिटिव्ह’ आले व त्यांनी घरीच म्हणजे ‘होम आयसोलेशन’ होऊन घरीच उपचार घेण्याचा निर्णय घेतला. त्या नागरिकांना ‘कोविड सेंटर’ला घेऊन जाणे, औषधोपचार करून घरी सोडणे आदी कार्य माने दाम्पत्य तन्मयतेने करत आहे.
नागरिकांनी कोरोनाला घाबरू नये. आपण जर खंबीर राहिलो तर कोरोनावर मात करणे सहज शक्य आहे. कोरोना हा आजार डोक्यात न घेता तो डोक्यावरून जाऊ द्यावा. कोरोना हा एक बरा होणारा आजार आहे. त्यामुळे मानवता धर्म जोपासत ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आणि गरजू नागरिक यांना मदत करावी.
याकामी ‘साकार ग्रुप’चे मनोज नारोडिया पटेल, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे विजय हाके, पांजरपोळचे मॅनेजर सागर आगळे, पक्षपातळीवर भारतीय जनता पक्ष नाशिक महानगरातील सर्व पदाधिकारी, भाजप तपोवन मंडलातील सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मदतीचे हे कार्य प्रभागात अविरत सुरू राहावे यासाठी शुभम सोनवणे, आयुष यादव, कौस्तुभ पाटील, माधुरी गायकवाड, आशाताई वाघ, सुरेखा थोरात, चासकरताई, महालेताई आदी कार्यकर्त्यांची फौज आजही कार्यरत आहे. माने यांना मदतकार्यात नाशिक महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले. मनपामार्फत प्रभागात तीन वेळा एकूण २३८ किमी क्षेत्रात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. याकामी त्यांना मनपाचे विभागीय अधिकारी विवेक धांडे, संजय दराडे, काळे, कानडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कोरोना महामारीमुळे लोक भेदरलेल्या अवस्थेत होते. तसेच, कोरोनाबाधितांबद्दल सुरुवातीच्या काळात काही नागरिकांच्या मनात द्वेषभावना निर्माण झाली होती. त्यामुळे लोकांना मानसिक आधार देणे आणि त्यांचे प्रबोधन करण्याचे मोठे आव्हान माने यांच्या समोर होते.
एका परिवारातील ११ सदस्य हे ‘पॉझिटिव्ह’ आले होते. त्यामुळे त्या घरातील अन्य सदस्य घाबरले होते. अशावेळी माने दाम्पत्याने त्या ‘पॉझिटिव्ह’ नागरिकांच्या ताटात जेवण करत इतरांना याआजाराची नेमकी माहिती देत त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात असे धारिष्ट्य दाखविणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. माने यांच्या संपर्क कार्यालयात एक कुटुंब कोरोना चाचणी करून घेण्याकामी दोन लहान मुले, पती व पत्नी असे चौकोनी आले असता, त्या कुटुंबातील महिला ही कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आली. हे पाहून त्या घरातील पुरुष हा अक्षरश: रडायला लागला. त्यांचे रडणे पाहून ती लहान मुलेदेखील धाय मोकलून रडायला लागली. हे पाहून माने यांचे मन विच्छिन्न झाले. माने यांनी त्या कुटुंबास आधार देत त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत केला. तसेच, हिरावाडी येथील एक गृहस्थ कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आल्याने त्यांना उपचारार्थ माने यांनी दाखल केले होते. मात्र, त्यांचे निधन झाले. त्यांचा चेहरा आजही डोळ्यासमोर येत असल्याचे माने सांगतात. नागरिकांच्या ताटात जेवण करत त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारे माने यांचे कार्य आजही अविरत सुरू आहे. त्यांचे कार्य हे अनेकांसाठी नक्कीच पथदर्शक ठरणारे आहे.