कष्टकरी, मध्यमवर्गीय तसेच उच्चभ्रू नागरिकांचा परिसर म्हणून हा परिसर ओळखला जातो. या परिसरात असणार्या गरीब वस्तीमधील नागरिकांना कोरडा शिधावाटप करण्याबरोबरच लगतच्या महामार्गावरून पायी चालणार्या परप्रांतीय नागरिकांनादेखील अन्नधान्य, शिजवलेले जेवण यांचे वाटप करत थोरात यांनी माणुसकी जोपासण्यास प्राधान्य दिले. थोरात यांच्या मदतीचा ओघ या काळात संपूर्ण प्रभाग व गरीब वस्ती यात ओसंडून वाहत होता. मदतीचा हा ‘अश्वमेध’ सुफल संपन्न करण्यासाठी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा त्यांना मोलाचा हातभार लाभला. तसेच, त्यांचे पती चंद्रकांत थोरात यांनी स्वतः पुढाकार घेत या मदतकार्यात स्वतःला झोकून दिले. तसेच, त्यांना आमदार देवयानी फरांदे, राजेश दिवाणी, गजू शुक्ल, डॉ. शर्मा, हाकीमभाई काचवाला, खांबेकर सर, बाळासाहेब काठे, नितीन बोरसे, जय माळी, हर्षल पाठक, दत्तू भोये, उत्तम भोये, गोरख कांबळे, गौरव ब्रम्हणे, सूरज परदेशी, दीपक घुले यांसह सर्वच कार्यकर्त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.
‘लॉकडाऊन’ काळात अनेक संस्था, नागरिक, मित्रमंडळेही मदतकार्य करण्यास उत्सुक होती. त्यामुळे गरजवंत नागरिकांना विविधांगी आणि सर्वसमावेशक मदत करता यावी, यासाठी काही सामाजिक संस्था थोरात यांच्या कार्यात जोडल्या गेल्या. त्यात श्री समर्थ मित्रमंडळ, वनअर्थ फाऊंडेशन, कच्छ कडवा पाटीदार समाज, सेफी अॅम्ब्युलन्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनी, बालाजी ग्रुप, दावदी बोहरा समाज, द्वारका ज्येष्ठ नागरिक संघ, महिला बचतगट यांचे विशेष सहकार्य आणि दातृत्व थोरात यांना लाभले. थोरात यांच्यामार्फत करण्यात आलेले कार्य हे नगदी स्वरूपाचे नक्कीच नव्हते. मात्र, जिन्नस स्वरूपात करण्यात आलेले हे कार्य निश्चितच बहुमोल अशा स्वरूपाचे होते. त्यासाठी अंदाजे तीन ते चार लाख रुपयांपर्यंतचा खर्च लोकसहभागातून केला, असे थोरात यांनी सांगितले.
सत्कार्य करत असताना संकटे ही उभी ठाकणारच. शेतकरी कुटुंबाचा वारसा असल्याने थोरात यांच्याठायी संकटांचा सामना करण्याची लढवय्या वृत्तीही आहेच. त्यामुळे ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे वस्तूंचा पुरवठा कमी पडण्यासारख्या संकटांचा सामना त्यांनी लीलया केला. जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी अन्नधान्याची तजवीज केली. तसेच, लोकांची मागणी जास्त असल्याने वाटपप्रसंगी आशेने मोठी गर्दी होत असे. त्यामुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा न उडू देण्याचे आव्हान थोरात यांच्यासमोर होते. यासाठी कार्यकर्ते आणि प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले. यावेळी थोरात यांनी मास्क परिधान न करणार्या नागरिकांचे प्रबोधन करण्यावरही भर दिला. नाशिकमध्ये नंतरच्या काळात कोरोनाचा प्रसार वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा वेळी नागरिकांना धीर देण्याचे व त्यांच्यापर्यंत मदत पोहोचती करण्याचे कार्य इच्छाशक्तीच्या बळावर थोरात दाम्प्त्याने पार पाडले. कुटुंबाने स्वत:च्या शेतातील माल हा गरिबांसाठी उपलब्ध करून दिला, हे थोरात आवर्जून नमूद करतात. तसेच त्यांचे पती चंद्रकांत थोरात यांनी सर्व परिसरात व प्रभागात फिरून मदत मिळावी यासाठी भेटी घेऊन नागरिकांची विचारणा केली. हे कार्य ते आजही अविरत करत आहेत.
नागरिकांना आर्थिक गरज नसून नागरिक स्वाभिमानी आहेत. त्यामुळे भविष्यात नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याकामी अर्चना थोरात या अविरत कार्यरत राहणार आहेत. त्यासाठी त्या लोकसहभागातून हाताला काम देण्यासाठी रोजगार निर्माण करण्यावर आगामी काळात भर देणार आहेत. प्रभागातील नागरिकांना योग्य आणि उत्तम अशा औषधोपचारांचा लाभ घेता यावा, यासाठी त्या सुसज्ज रुग्णालयाची उभारणी करण्याचा मनोदय व्यक्त करतात. अर्चना थोरात यांच्या प्रभागात वास्तव्यास असणार्या एका महिलेचे आईवडील सदर महिलेच्या घरी आले होते. दोन दिवस मुक्काम करून ते आपल्या समवेत दहा महिन्यांच्या नातवासदेखील अहमदाबाद येथे सोबत घेऊन गेले. त्या बाळाची आईही दुसर्या दिवशी अहमदाबाद येथे जाणार होती आणि नेमके दुसर्या दिवशी भारतात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र व गुजरात राज्याची सीमादेखील बंद झाली. ‘लॉकडाऊन’ असल्याने संबंधित महिलेला जाणे शक्य झाले नाही. मात्र, थोरात यांनी पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय अशा सर्वच पातळीवर सदर महिलेची आपबिती वर्णन केली. याकामी त्यांना आमदार व खासदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सरतेशेवटी ती महिला १५ दिवसांनी आपल्या बाळाजवळ अहमदाबाद येथे पोहोचली. मायलेकराची भेट घडवून आणण्याचा हा अनुभव फारच हृदयस्पर्शी असल्याचे थोरात आवर्जून नमूद करतात.
मदत केल्यानंतर लोकांचा प्रतिसाद हा उत्तमच असतो. पण, ज्या गरजू लोकांपर्यंत जी मदत पोहोचली त्यांच्या चेहर्यावर एक समाधान होते की अशा परिस्थितीत आपल्या मदत करण्यासाठी कोणीतरी आहे. हे पाहून मानवी जन्म धन्य झाल्याचे भाव मनी उमटल्याचे थोरात सांगतात. समाजातील जवळपास सर्वच स्तरातील नागरिकांना थोरात यांनी मदत केली. त्यांच्या मदतीमुळेच लेकरू आईच्या कुशीत विसावू शकले. आपण नागरिकांचे सेवक आहोत, या भावनेतून त्यांनी केलेले कार्य हे नक्कीच मानवतेसाठी पथदर्शक आहे.