ठाणे रेल्वे स्थानक परिसरात करतायेत आंदोलन
ठाणे: केंद्र सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे लागू केल्याने संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. सदर कायद्यांवर काही आक्षेप असल्याने याविरोधात शेतकऱ्यांनी दंड थोपटले आहेत. पंजाब हरियाणा येथून सुरु झालेले हे आंदोलन आता देशभर पसरले आहे. इतके दिवस ह्या आंदोलनाकडे लक्ष न दिलेले पक्ष आता अचानक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.
सदर कायद्यांमुळे दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ, ठाण्यातील वंचित बहुजन आघाडी आक्रमक झालीय. केंद्रात पास करण्यात आलेले कायदे रद्द करण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी वंचितचे ठाणे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी स्टेशन परिसरात सुरू असलेली दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
आज सर्वच पक्षांनी भारत बंदची हाक दिली असून राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विश्रामगृहासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. सर्व ठाणेकरांनी या बंद मध्ये सामील होऊन स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाडवा अशी विनंती राष्ट्रवादीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे.