पिंपरी-चिंचवडच्या महापौर या नात्याने उषा उर्फ माई ढोरे या महामारीच्या काळात शहराचा आधार बनून भक्कमपणे नागरिकांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. शहरात कोरोनाचा मार्च महिन्यात शिरकाव झाल्यापासून ते आजपर्यंत प्रत्यक्ष शहरात फिरून परिस्थितीचा माईंनी आढावा घेतला. शहरातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यापासून ते गरजूंना जेवण पुरविणे, प्रसंगी स्वखर्चाने आरोग्यसंबंधी व्यवस्था पुरविणे अशा प्रत्येक स्तरावर शहरवासीयांची जबाबदारी माईंनी लीलया पेलली.
उषा उर्फ माई ढोरे
राजकीय पक्ष : भाजप
पद : महापौर, पिंपरी-चिंचवड मनपासंपर्क क्र. : 9922501671
पिंपरी-चिंचवड शहरात मार्च महिन्यात कोरोनाचे पहिले तीन रुग्ण आढळले. अशा परिस्थितीत शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने पालिकेने कठोर निर्णय घेतले. कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांत विशेष सोय करण्याचे आव्हान महापौर म्हणून माईंसमोर होते. शहरातील नागरिकांना ‘लॉकडाऊन’ असताना नागरिकांच्या गरजांचाही विचार महापौर म्हणून करणे, या दोन्ही पातळ्या सांभाळण्याचे काम महापौरांनी केले. शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यानंतर शहरातील नागरिकांना शासनाने दिलेले नियम पाळण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या. महापौर म्हणून नागरिकांना विश्वास देत, कोरोनासंबंधी जनजागृती करण्यावर माईंनी भर दिला. हातावर पोट असलेल्या नागरिकांना घरात राहणे कठीण जात होते. त्यामुळे त्यांची सोय करण्याकडे लक्ष देण्यात आले. पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी असल्याने हातावर पोट असलेल्या नागरिकांसाठी जेवणाची सोय करण्यात आली. ज्या नागरिकांना जेवणाची कसलीच सोय नाही, अशांना घरापर्यंत जेवण पुरविले जाऊ लागले. तसेच नागरिकांना धान्य आणि आवश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे काम प्रत्येक प्रभागात घेण्यात आले. महापौरांनी यासाठी पुढाकार घेत, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, अशा ठिकाणी स्वखर्चातून धान्यवाटप, जेवणाचे वाटप केले.
शहरात अचानक उद्भवलेल्या या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये शहराचे आरोग्य राखणे हे खूप मोेठे आव्हान होते. महिला आणि वयाने ज्येष्ठ असूनही महापौरांनी घरात न राहता, प्रत्यक्ष नागरिकांची सेवा करण्याला प्राधान्य दिले. सुरुवातीला कोरोना झाला की नाही, हे तपासण्यासाठी कोरोना चाचण्यांवर भर देण्यासाठी महापौरांनी सूचना दिल्या. त्यानुसार शहरातील यंत्रणा कामाला लागली. कोरोना चाचण्यांमुळे शहरातील रुग्णांची संख्या समोर आली. त्यामुळे उपचार करणे सोपे होत गेले. कोरोनाग्रस्तांची संख्या नेमून दिलेल्या रुग्णालयांपेक्षा अधिक झाल्यानंतर कोरोना सेंटरची सुरुवात केली. या परिस्थितीत औषधांची पूर्तता, प्लाझ्मा मशीन यांची कमतरता निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली. यासाठी महापौरांनी प्रसंगी प्रशासनाकडे दाद मागितली. तसेच प्रत्येक बाबींचा पाठपुरावा करून रुग्णांना वेळेत सेवा दिली. शहरातील नागरिकांनी सुरुवातीला घराबाहेर न पडता सर्व नियम पाळले. मात्र, काही दिवसांतच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने शहरवासीयांच्या अडचणी वाढल्या. या परिस्थितीत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापौरांनी अविरत कार्यरत राहणे पसंत केले. रुग्णांच्या अडचणी सोडविण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले.
‘कोविड सेंटर’ला भेट देत कोरोनाच्या रुग्णांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत, त्यांची परिस्थितीही जाणून घेतली. या काळात महापालिकेत वैद्यकीय विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांनाही मुदतवाढ देत महापौरांनी दिलासा दिला. त्यामुळे कोरोनासारख्या संकटातही सर्वस्तरांवर कार्यरत राहून महापौरांनी शहराला खंबीर साथ दिली. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना मार्च-एप्रिल दरम्यान कोरोनासंबंधीची प्रचंड भीती वाटत होती. अशा काळात नागरिकांना दिलासा देणे आणि त्याचबरोबर प्रशासनावर लक्ष ठेवून आरोग्यव्यवस्था सांभाळण्याचे माईंचे काम महत्त्वपूर्ण ठरले. माईंनी एकही दिवस घरातून काम न करता, प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून त्या अडचणी सोडविल्या. ‘महापौर आपल्यासोबत आहेत’ हा विश्वास नागरिकांसह, अधिकारी, डॉक्टर, परिचारिका अशा सगळ्यांनाच असल्याने कामाला गती आली. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असताना, शहरातील काही भाग अतिसंवेदनशील बनले. या परिस्थितीत महापौरांनी स्वत: प्रत्येक ठिकाणी उपस्थिती दर्शवत, प्रसंगी ‘पीपीई’ किट परिधान करून रुग्णालयांना भेटी दिल्या. संबंधित डॉक्टर, अधिकार्यांशी चर्चा केली. रुग्णांची स्थितीही जाणून घेतल्याने रुग्णालयाच्या प्रशासनाला हुरूप आला.
कोरोनाकाळात आरोग्य व्यवस्था सांभाळण्यासोबतच अनेक आव्हाने शहरावर होती. या काळात संयम ठेवून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचे काम मी महापौर म्हणून आपले आद्य कर्तव्य समजून केले. शहराचे पालकत्व स्वीकारल्यामुळेच मला हे शक्य झाले.
झपाट्याने वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या आणि एकीकडे वाढणारा मृत्युदर चिंताजनक होता. या परिस्थितीत महापौरांनी मृत्युदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले. वेळप्रसंगी आवश्यक कठोर निर्णय घेतले. यासाठी प्रशासन, आरोग्ययंत्रणा यांचा समन्वय ठेवण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली. दररोज रुग्णसंख्या, रोजची रुग्णालयातील परिस्थिती, अडचणी यांबाबत आढावा घेतला. रुग्णालय, प्रशासन यांच्याशी झूम बैठकांद्वारे संवाद साधला. यामुळे एकाच वेळी नियंत्रण ठेवल्याने मृत्युदर कमी झाला. शहराची लोकसंख्या पाहता, कोरोना चाचण्यांची संख्याही वाढविल्यामुळे प्रत्यक्ष स्थितीवर उपाययोजना करणे शक्य झाले.
खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना उपचारांमध्ये काही कमतरता राहणार नाही, यासाठी महापौरांनी लक्ष घातले. प्रसंगी खासगी रुग्णालयांना भेटी दिल्या. इंजेक्शन, औषधांची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत होती. ही शहराची गरज पूर्ण होण्यासाठी कमी राहू नये म्हणून महापौरांनी स्वखर्चाने इंजेक्शन, औषधे रुग्णांपर्यंत पोहोचविली. शहराची कुटुंबप्रमुख म्हणून प्रत्येक जबाबदारी मनापासून पार पाडली. दिवसभर सतत कार्यरत राहून रात्रीच्या वेळीही कोरोनाग्रस्तांच्या नातेवाईकांचे फोन माईंनी घेतले. शहरालाच जणू आपले कुटुंब मानल्याने त्यांनी रात्री-अपरात्रीही रुग्णांची सोय केली, त्यांना आवश्यक मदत पुरविली. त्यामुळे नागरिक आणि आरोग्यव्यवस्था यातील दुवा बनून त्या राहिल्या.
‘लॉकडाऊन’ असताना दररोज अनेक फोन माईंना येत होते. माईंनी नागरिकांच्या प्रत्येक फोनला उत्तर देत त्यांच्या समस्या सोडविल्या. शहरात बाहेरच्या राज्यांतून कामासाठी आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. शहरातील भाडेकरूंची संख्या पाहता, त्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने माईंनी दिलासादायी निर्णय घेतला. मालकांनी भाडेकरूंना भाडे देण्यासाठी तगादा लावू नये, असे सुचविल्याने अनेकांना दिलासा मिळाला. कोरोनापाठोपाठ इतर काही समस्याही नागरिकांना सतावत होत्या. अशाकाळात शहरातील अनेक महिलांनाही नवा उद्योग सुरू करण्यासाठी मदत केली. ‘लॉकडाऊन’नंतर महापौरांना प्रत्यक्ष भेटायला येणार्या नागरिकांची संख्या मोठी होती. महापौरांनी आपल्या वयाची चिंता न करता, प्रत्येकाला भेट देत त्यांची समस्या जाणून घेतली. केवळ समस्या ऐकून त्या शांत राहिल्या नाही, तर त्यांनी ती वेळीच सोडविली. त्यामुळे नागरिकांचा विश्वास वाढला. कोरोनापूर्व स्थिती, कोरोनादरम्यानची चिंताजनक परिस्थिती आणि कोरोनानंतरची परिस्थिती या प्रत्येक वेळी महापौरांनी नागरिकांच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतल्याने शहराला मोठा आधार मिळाला. नावाप्रमाणेच जणू शहराच्या माई असलेल्या महापौरांनी कष्ट, संयम, अविरत मेहनत, कामाची धडाडी, योग्य निर्णयक्षमता या जोरावर माईंनी केलेल्या कामाचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.
-सुशील कुलकर्णी