मनसेचा महाविकास आघाडीला सवाल
मुंबई : शेतकरी आंदोलनाचा वाढता जोर पाहून आता ११ दिवसांनंतर केंद्रातील विरोधी पक्षांनी त्यांना पाठींबा देण्यासाठी सुरुवात केली आहे. काँग्रेसनंतर तृणमुल, टीआरएस, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यासह अन्य पक्षांनी याला पाठींबा दर्शवला आहे. मात्र, मनसेची भूमीका काय, असा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तूळात विचारला जात होता. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत महाविकास आघाडीलाच प्रश्न विचारला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम शेतकऱ्यांसोबत उभी आहे. मात्र, आज जे आरडाओरड करत आहेत. ते राज्यसभेत गप्प का होते, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन आता दिवसागणिक तीव्र होत आहे. केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेण्याचे ठरवले आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबर रोजी 'भारत बंद' पुकारला आहे. शेतकऱ्यांच्या या बंदला विरोधी पक्षांनी पाठींबा दर्शवला आहे.