'या' गोष्टीवर ठाणेकरांना मिळणार सवलत
ठाणे: कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागले आहे. या गोष्टीचा ठाणे महापालिकेच्या उत्पन्नावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तरीही सामान्य ठाणेकर जनतेसाठी नववर्षाच्या मुहूर्तावर महापालिकेने खास भेट आणली आहे. आणि ही भेट ठाणेकरांची आर्थिक चिंता मिटवणारी ठरणार आहे.
ठाणे महापालिकेकडून ठाणेकर जनतेला आर्थिक दिलासा देण्यासाठी, पाणीपट्टी व मालमत्ता कराच्या दंड/ व्याज, शास्ती (वाणिज्य वगळून) आदीमध्ये १ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीत १०० टक्के सवलत देण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी नुकत्याच झालेल्या मा. सर्वसाधारण सभेत दिले होते. त्यास ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी मान्यता देऊन त्याची अमंलबजावणी केली आहे. 'या अभय योजनेचा लाभ घेवून नागरिकांनी आपला कर भरणा करावा' असे आवाहन ठाणेकरांना करण्यात आले आहे.
जे नागरिक, करदाते पाणीपट्टी व थकीत मालमत्ता कराच्या रकमेसह चालू आर्थिक वर्षाचा कर अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी भरतील त्यांनाच ही योजना लागू होणार आहे. ज्यांनी यापूर्वीच दंड/ व्याजासह कराची रक्कम जमा केली असेल, त्यांना सदरची योजना लागू होणार नाही.