अंबरनाथ : रस्त्याची दुर्तफा सुरू असलेली कामे आणि त्यातच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या त्यांच्या वाहनांच्या गर्दीने अंबरनाथमध्ये सोमवारी दुपारी सुमारे दोन तास अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. अंबरनाथ तालुकयात २७ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
१५ जानेवारी २०२१ रोजी निवडणूका होणार आहेत. त्यासाठी अंबरनाथ तहसिलदार कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इच्छुक उमेदवार चारचाकी वाहनांतून आले. ही वाहने अंबरनाथ तहसीलदार कार्यालयाबाहेर अंबरनाथ-बदलापूर महामार्गाच्या बाजूला उभी करण्यात आली.
त्यातच तहसीलदार कार्यालय ते विमको नाक्यापर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे, या कामासाठी खडी आणि इतर साहित्य वाहून नेणारी अवजड वाहने यांची वर्दळ असल्याने भर दुपारी दोन वाजताच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली, सुमारे एक किमी अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीत काही रुग्णवाहिका देखील अडकल्या होत्या, मात्र त्यांना जाण्यास जागा करून देण्यात आली.
ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने वाहतूक कोंडी होऊ नये याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना वाहतूक पोलीस आणि पोलिसांना देण्यात आल्या आहेत, वाहतूक कोंडी होऊ नये याबाबत पुन्हा संबंधितांना सूचना देऊ असे तहसीलदार जयराज देशमुख यांनी सांगितले.