मुंबई : कोविड काळात विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन सुरू असणाऱ्या शिक्षणात आता शाळा शुल्क न भरल्याने व्यत्यय निर्माण करत आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांना शुल्क भरणा करण्यासाठी उशीर होत असेल तर अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात नसल्याचा प्रकार मुंबई, पुणे आणि नागपूरच्या तब्बल ७४ शाळांध्ये उघड झाला आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे तक्रार लिहीली आहे.
शाळा बंद असल्याने विद्यार्थी अनेक सुविधा वापरत नाहीत. तरीही भरमसाठ शुल्क आकारले जात असल्याची तक्रार सातत्याने पालक करत आहेत. त्याचवेळी शुल्क घेतले नाही तर शाळेची देखभाल, शिक्षकांचे वेतन आदी खर्च आम्ही कसे भागवणार, असा प्रश्न शाळा विचारत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गाबाहेर ठेवण्याचे अस्त्र शाळा प्रशासनाने उघडले आहे. या ७४ शाळांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी बच्चू कडू यांच्याकडे करण्यात आली आहे.