ऊर्मिला मातोंडकर या अभिनेत्रीने शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरबाईंसारखे अभिनेत्रींना नटीबिटी म्हणणे प्रशस्त वाटत नाही. पण, महापौरबाईंच्या पक्षात ऊर्मिला ऊर्फ ‘मीर अख्तर’ यांनी प्रवेश केला. त्यावेळी पक्षाचे लोकल चाणक्य संजय राऊत म्हणाले की, “आता शिवसेनेची महिला आघाडी अजून मजबूत होईल.” वा वा...! ‘उद्धवा, अजब तुझे सरकार, पतीव्रतेला मिळतो धोंडा...’ पुढचे गीतवाक्य म्हणणार नाही. पण, इथे ‘पतीव्रतेला मिळतो धोंडा’ हे वाक्य लिहिताना तमाम माता-भगिनी डोळ्यांसमोर येतात. ‘आवाज कुणाचा?’ म्हटल्यावर ज्यांच्या अंगात रणचंडी संचारते, त्या माता-भगिनी ज्या निवडणुकीमध्ये अक्षरशः २०-२० तास काम करतात. वडापाववर दिवसभर राहतात. त्यांचे दहाबाय दहाचे घर. घरात सासू-सासर्यांसकट दीर-जावा आणि मुलाबाळांचा गोतावळा. त्या सगळ्यांचं आवरून ही रणचंडी प्रचंड ऊर्जेने केवळ आणि केवळ साहेबांसाठी (साहेब म्हणजे बाळासाहेब ठाकरे होय), भगव्या झेंड्यासाठी लढायची. तिच्यावर केसेस व्हायच्या. स्वत:च्या पैशाने अगदी कर्ज काढूनसुद्धा ती कोर्टात वकील करायची. पण, लढायची. ती रणरागिणी कुठे आहे? ती आता मुंबईच्या बाहेर दिवा, कल्याण, टिटवाळ्याला आहे. तिच्या मुलाबाळांचे काय? तर मुलंही ‘आवाज कुणाचा’च्या आवेशातच वाढलेली. त्यामुळे स्वत:चे आयुष्य घडविण्याचे राहूनच गेले. गटप्रमुख म्हणून झालेली नियुक्ती शाखा प्रमुखापर्यंतही पोहोचत नाही. आज या सार्या सार्यांची आठवण झाली. कारण म्हणे, ‘मीर अख्तरबाई’ आता शिवसैनिक झाल्या. खरे तर, शिवसैनिक असू दे की, काँग्रेसी असू दे की, भाजपवाले असू दे, ते ‘व्हावे’ लागत नाही, तर ती एक मानसिक आणि राजकीय संस्कृतीची अनुभूती असते. त्यातूनच कुणीही कट्टर शिवसैनिक किंवा कट्टर भाजपवाला होऊ शकतो. बाकी तर सगळे पिंडावरचे कावळे. घास दिसला की आले. पण, हे पक्षप्रवेश करणारे कावळे घास घेतात तो सच्च्या कार्यकर्त्याच्या राजकीय भविष्याचा. असो, आवाज कुणाचा? असे म्हणत, रणरणत्या उन्हात भगव्या साड्या घालून इज्जत, अब्रूचे जगणं जगणार्या आणि शिवसेनेसाठी मरमर राबणार्या त्या माता-भगिनींचे मात्र वाईट वाटते.
ऊर्मिला अख्तर मुबारक हो...
“मी जन्माने आणि कर्माने हिंदूच आहे,” असे कुणी म्हणावे तर ऊर्मिला मातोंडकर ज्या आता ऊर्मिला अख्तर आहेत यांनी? तर ऊर्मिला अख्तर यांनी हे म्हणताना ‘हिंदुत्व’ कोणते याचीही पोपटपंची केली. हिंदुत्व कसे सहिष्णू आहे, उदार आहे वगैरे वगैरे. पण, २०१९ साली तर मीर अख्तर यांनी, “हिंदू धर्म हा सगळ्यात हिंसक धर्म आहे,” म्हटले होते. स्वतःला ‘मुंबईची मुलगी’, ‘मराठी मुलगी’ म्हणताना, ऊर्मिला अख्तर यांनी मराठी चित्रपटात किंवा नाटकांमध्ये काम केले आहे, असे ऐकिवात तरी नाही. यापूर्वी ‘रंगिला गर्ल’ म्हणून बॉलीवूडमध्ये त्या मस्त होत्या. मात्र, मीर अख्तर यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांना अचानक राजकारणाचे वेड लागले. कुणी म्हणते, त्यांची चित्रपट कारकिर्द संपली, दुसरे उत्पन्नाचे साधन काय? मग आहेच आपले राजकारण. यावर काहींचे म्हणणे की, त्यांचे पती काश्मीरचे उद्योगपती आहेत. कोट्यवधींची संपत्ती आहे. त्यांना काय कमी? त्यांना आता जनसेवा करायची आहे, म्हणून म्हणे राजकारणात प्रवेश केला. जनसेवा करण्यासाठी राजकारणातच प्रवेश करायला हवा, त्यातही खासदारकी किंवा विनासायास आमदारकी मिळायला हवी, हे गणित मात्र समजण्यापलीकडे. त्यातच ऊर्मिला यांचे म्हणणे आहे की, त्यांनी काँगेस सोडली होती, पण जनसेवा सोडली नव्हती. ऊर्मिला यांनी १४ महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्ष सोडला. त्यानंतर जगभरात अनेक घडामोडी घडल्या. देशात कोरोनाने थैमान घातले. पण, या अशा कठीण काळात जनसेवा करायची आहे म्हणून ऊर्मिला कुठेही कधीही दिसल्या नाहीत. तेव्हा जनसेवा कुठे गेली होती? “मला लोकांनी निवडून दिलेली नेता बनायचे आहे,” असेही त्या म्हणतात. तर इथे मुद्दा असा आहे की, त्यांनी ज्या पक्षात प्रवेश केला आहे, त्या पक्षातल्या सर्वोच्च नेत्याला तरी जनतेने निवडून दिले आहे का? बरं, ‘लोकनेता’ व्हायची इतकी हौस आहे, तर मग विधान परिषदेची आमदारकी नाकारून पाच वर्षे पक्षात राहून जनसेवा करून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवा. जिंका. पण, हे होणे नाही. कारण, ऊर्मिला मातोंडकर यांचे मुंबईत पुन्हा येऊन सत्ताधारी होण्याच्या मनसुब्यामागे काहीतरी वेगळेच शिजत असल्याचे वाटत आहे. काळ थांबत नाही. पुढेमागे सत्य बाहेर येईलच. तूर्तास शिवसेनेस ऊर्मिला अख्तर मुबारक!