मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये स्थापित होणाऱ्या फिल्मसिटीसाठी हा मुंबईचा अभ्यास दौरा असणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यावर बॉलीवूड मुंबईला घेऊन जाण्यासाठी त्यांचे प्रयत्न असल्याचे विरोधकांकडून आरोप करण्यात आले. यावर त्यांनी सांगितले की, "आम्ही बॉलीवूड घेऊन जायला आलेलो नाही. ते मुंबईतच असणार आहे." असे सांगत या चर्चेवर त्यांनी पूर्णविराम दिला. बॉलिवूड मुंबईबाहेर घेऊन जाणे हे खिशातले पाकीट मारण्याइतके सोपे आहे का? असा मिश्कील सवालदेखील त्यांनी विचारला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, "आम्ही काहीच घेऊन जायला येथे आलेलो नाही. एक नवी चित्रनगरी उभी कण्याच्या उद्धेशाने हा दौरा करत आहोत. कोणीच कोणाची कुठलीही गोष्ट घेऊन जाऊ शकत नाही. सुरक्षा देण्याची, सामाजिक सुरक्षा देण्याची, कुणासोबत भेदभाव न करता चांगले वातावरण देण्याची गरज आहे. ती प्रत्येकाने दिली पाहिजे."
"बॉलिवूडमधील दिग्गजांचा अनुभव घेऊन त्यांच्या सूचनेनुसार नवे मॉडल तयार करायचे आहे. सर्वोत्तम फिल्मसिटी तयार करण्यासाठी चित्रपट सृष्टीतील लोकांशी चर्चा केली. आम्ही नवनिर्मिती करण्याच्या उद्देशाने आलो आहोत. कोणाच्याही गुंतवणुक पळवणार नाही. भारताची अर्थव्यवस्था वाढवण्याचे आमचे लक्ष असून सर्वांचेही हेच लक्ष असले पाहिजे." असे सांगत त्यांनी शिवसेनालाही टोला लगावला.