नवी दिल्ली : कोरोना साथीचा फटका बसलेल्या गोरगरिब जनतेच्या मदतीसाठी राबवण्यात येणार्या कार्यक्रमांसाठी आता जागतिक बँकेकडून अधिक मदतीचे बळ मिळालं आहे. केंद्र सरकार आणि जागतिक बँकेत यासाठी ४० कोटी डॉलरच्या अर्थसाह्याबाबत करार झाला. जागतिक बँकेकडून कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी भारताला मिळालेले हे दुसरे अर्थसाह्य आहे.
या आधी मे महिन्यात जागतिक बँकेने भारताला ७५ कोटी डॉलरचे अर्थसाह्य दिले आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर हातावर पोट असलेल्या गोरगरिबांना मोठा फटका बसला, अनेक जण विस्थापित झाले. या निधीतून सरकारला गोरगरिबांना सामाजिक संरक्षण पुरवणे तसेच विस्थापितांना अधिक भरीव मदत करणे शक्य होईल.