ठाणे : मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध 'यदा कदाचित' नाटकाचे नाट्यनिर्माते दत्ता घोसाळकर यांचे बुधवारी निधन झाले. मंगळवारी रात्री त्यांना ठाण्याच्या राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला. यावेळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी 'यदा कदाचित', 'देहभान', 'तन-मन' आणि 'इंदिरा'सारख्या दर्जेदार नाटकांची निर्मिती केली होती. एक उमंदे नाट्यनिर्माते हरपल्याने मराठी सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ठाण्याच्या महागिरी कोळीवाडा येथे राहणारे घोसाळकर मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील बोरसचे या गावचे. शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण ठाण्यातच घेणाऱ्या घोसाळकर यांनी मराठी नाटकांमधुन छोटया- मोठया भूमिका साकारून नाटकाची आवड जोपासली. १९९३ मध्ये त्यांनी गजेंद्र अहिरेलिखीत आईचं घर उन्हाचं या नाटकाद्वारे नाटयसृष्टीत निर्माता म्हणुन पदार्पण केले.त्यांच्या स्वतःच्या दत्तविजय प्रॉडक्शनच्या माध्यमातून १७ नाटके त्यांनी निर्माण केली. त्यात आईचं घर उन्हाचं, यदाकदाचित, देहभान, तनमन तुझ्याविना, रामनगरी, हम पांच सारखे वेगळे विषय त्यांनी हाताळले. ते एक उत्कृष्ट मराठी नाट्य निर्माते होते.
दत्तात्रय घोसाळकरांनी त्यांच्या संस्थेतर्फे ठाण्यातील अनेक लेखक, दिग्दर्शक, कलाकारांना रंगमंचावर प्रथम आणण्याचा प्रयत्न केला.त्यांचे यदा कदाचित रिटर्न हे नाटक २६ डिसेंबरपासून रंगभूमीवर येणार होते. कोरोनानंतर पहिलाच प्रयोग होणार होता. यदाकदाचित रिटर्न्स या नाटकात बाहुबली सिनेमाचा बॅकड्रॉप घेऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला होता.मात्र,हे नाटक नव्याने रंगभूमीवर येण्याआधीच घोसाळकर यांनी एक्झीट घेतल्याने कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.