तालवादक शिक्षक नवीन तांबट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2020
Total Views |

tambat _1  H x
 
 
 
 
नाशिक येथील ज्येष्ठ तबलावादक व कलाशिक्षक नवीन तांबट यांचे दि. ४ डिसेंबर रोजी निधन झाले. आज त्यांचा तेरावा दिवस आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेणारा हा श्रद्धांजलीपर लेख.
 
 
 
कोरोनाने मार्चपासून जगात हाहाकार माजविला आहे. अनेक दिग्गजांच्या आहुती त्यात गेल्या आहेत. नाशिकच्या संगीत व सांस्कृतिक क्षेत्रातील एक आहुती ४ डिसेंबरला पडली. ही आहुती मनाला चटका लावून गेली. संगीताचा झंकारच हरपला आणि सुरु झाली शोक धून. ही शोक धून होती सतत हसतमुख असलेल्या नवीन तांबटांची.
 
 
 
सरांचा मी विद्यार्थी आणि सहकारीसुद्धा.१९८१ साली पेठे विद्यालयात रुजू होण्यास गेलो. काहीच माहिती नाही. शाळेत प्रवेश केला आणि समोर तांबट सर दिसले. त्यांनी ओळख दिली. “का आला आहात”, असे विचारले. मी नेमणूक पत्र दाखवले. तांबट सरांना अतीव आनंद झाला. मला लगेच ते तत्कालीन अधीक्षक काळे सरांकडे घेऊन गेले.
 
 
 
माझी ओळख करुन दिली. मी पेठे विद्यालयात रुजू झालो. आता माझी ओळख ‘तांबट सरांचा विद्यार्थी’ ही झाली. सरांनी मलाच मदत केली का? नाही! माझ्या जागी कोणीही विद्यार्थी असता तरी सरांनी असेच केले असते. विद्यार्थी सरांचा श्वास होता. त्या अर्थी ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते.
 
 
 
 
तांबट सर मला सहावीला शिक्षक म्हणून होते. वार्षिक परीक्षेच्या वेळेस मी आजारी पडलो. शेवटचा पेपर देताना मला चक्कर आली. सरांनी मला घरी आणून सोडले. मला नंतर हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्हावे लागले. मी जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये होतो, तोपर्यंत सर रोज मला बघण्याकरिता येत होते. ती ओळख सरांनी तशीच जपून ठेवली आणि मी रुजू होण्यास पेठे विद्यालय गेलो तेव्हा ती आठवणीने दिली.
 
 
 
पेठे विद्यालयात नोकरीस लागल्याने नंतर सरांबरोबर अनेक वर्षं काम करण्याची संधी मिळाली. सरांबरोबर काम करत असताना सर कायम एका मार्गदर्शकाच्या भूमिकेत असले तरी ते मित्रत्वाने वागत. सरांचे लहानपण नवीन तांबट गल्लीत गेले. घरची सामान्य परिस्थिती होती. शिक्षण सर्व रुंगठा विद्यालयात झाले.
 
 
 
सर आपल्याला एक वादक म्हणून संगीतकार म्हणून शिक्षक म्हणून दिसतात, पण सर एक उत्कृष्ट मल्लखांब खेळाडू होते. मल्लखांबाची अनेक पारितोषिके त्यांनी रुंगठा विद्यालयास मिळवून दिलेली होती. सरांचा विषय हस्तकला व चित्रकला होता. पण संगीताची आवड असल्याने सर संगीतातही काम करू लागले होते.
 
 
 
 
संगीतकार बाळ भाटे अनंत केळकर हे ज्येष्ठ शिक्षक असले तरी सर त्यांच्याबरोबर संगीतात काम करू लागले. सर जे काम करणार ते जीव ओतून करणार, स्वतःहून करणार आणि त्याला खास स्वतःचा ‘टच’ देणार. विद्यालयाचा कुठलाही कार्यक्रम असला तर सर स्वतःहून त्यात काम करणार. कार्यक्रम यशस्वी झाला त्याचे श्रेय सर्वांना देणार. “मी नाही आम्ही सर्वांनी केले,” असे ते सांगणार.
 
 
 
सर संस्था राजकारणात राहिले पण त्यांना राजकीय शत्रू कधी झाला नाही. त्यांचे कोणाबरोबर मतभेद झाले असतील, पण त्यांनी मनभेद कधी होऊ दिला नाही. संस्थेच्या शिक्षक मंडळाच्या निवडणुकीत ते उमेदवार म्हणून उभे राहिले. निवडणुकीचा प्रचार वेगळ्या पद्धतीने केला. सर प्रत्येक शिक्षकाच्या घरी गेले, गप्पा मारल्या आणि परत आले. त्यांच्या विरोधात उभे होते, त्यांच्याही घरी सर गेले.
 
 
 
सरांनी निवडणुकीत यशश्री खेचून आणली. पेठे विद्यालय नाशिकचे सांस्कृतिक केंद्र होते. लोकहितवादी मंडळाचे कार्यक्रम व सराव शाळेत होत असे. तात्यासाहेब शिरवाडकर, वसंतराव कानेटकर त्यावेळेस उपस्थित राहत. सर या सर्व कार्यक्रमात हिरिरीने सहभागी होत असत.
 
 
 
ते उत्कृष्ट तबला, कोंगो, नाल वादक होते. सार्वजनिक कार्यक्रमात ते सदैव सहभागी होत. हृदयनाथ मंगेशकर, बाबुजी फडके, यशवंत देव, श्रीनिवास खळे अशा दिग्गजांना त्यांनी संगीताची साथ केली होती. संगीत कार्यक्रमाकरिता त्यांनी परदेशवारी पण केली होती. मात्र, याचा त्यांना अभिनिवेश नव्हता.
 
 
 
सर सर्वांना मदत करण्यासाठी तत्पर असत. मी ‘नाशिक एज्युकेशन सोसायटी’च्या ‘क्रेडिट सोसायटी’चा सेक्रेटरी होतो. सभासदांकरिता सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याची इच्छा होती. कार्यकारी मंडळ व ‘नाशिक एज्युकेशन सोसायटी’च्या पदाधिकार्‍यांनी अनुमती दिली. काय कार्यक्रम घ्यायचा? हा प्रश्न पडला. तांबट सरांना सांगितले. त्यांनी क्षणात सांगितले, यशवंत देव यांना बोलवायचे.
 
 
 
माझी ओळख नाही सर, तसेच कार्यक्रमाचे बजेट कमी आहे. “तू कशाला काळजी करतो, मी आहेना. तू चांगली प्रथा सुरु करतो आहेस. पहिला कार्यक्रम देवांचाच घ्यायचा.” शाळा सुटल्यावर मला रमेश देशमुख सरांकडे घेऊन गेले. सरांनी आमचे समोर यशवंत देवांना फोन केला. कार्यक्रम निश्चित केला. बिदागी त्यांनीच सांगितली आणि फोन माझ्याकडे दिला आणि त्यांना निमंत्रण देण्यास सांगितले.
 
 
 
पुढे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोघांनी अथक प्रयत्न केले, कार्यक्रमाच्या दुसर्‍या दिवशी तांबट सरांनी ‘टिचर्स रुम’मध्ये शरद जाधवनी उत्तम कार्यक्रमाची मेजवानी दिली त्याचे हार्दिक अभिनंदन असा बोर्ड लिहिला. सर्व श्रेय त्यांचे असताना मी सेक्रेटरी म्हणून माझे नाव दिले. इतका मनाचा मोठेपणा फक्त तांबट सरच दाखवू शकतात.
 
 
 
मी त्यांना असे का केले, असे विचारले. ते म्हणाले, “अरे मी मदत केलीच पाहिजे. आपला कार्यक्रम आहे. तू सेक्रेटरी आहे म्हणजे यशाची व अपयशाची जबाबदारीही तुझीच.” इतका मनमोकळ्या मनाचा हा माणूस. काम, मदत, सहकार्य करण्यास तत्पर ! त्यात स्वतःचा असा कुठलाही ‘मी’पणाचा भाव नाही.
 
 
 
सर उत्कृष्ट शिक्षक, तबला व नालवादक, तालवादक, संगीतकार जगतमित्र होते. स्वतःचा ‘स्वरदा सुगम संगीत वर्ग’ होता. त्या माध्यमातून ते नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देत.होते. संगीत क्षेत्रात नवनवीन कलाकाराचा उदय करण्याचे मोठे काम सरांनी केले आहे.
 
 
 
सरांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक ‘मानाचे पुरस्काराने सन्मानित’ केलेले आहे. सरांना मात्र नाशिकचे ‘जनस्थान’ व्हॉट्सग्रुपचा पुरस्कार आनंददायी वाटत होता. एनडीएसटी सोसायटी, लायनेस क्लब या नाशिकचे संस्थांनीही सरांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरवलेले आहे. अर्थात, सरांना सन्मानित करुन त्या पुरस्कारांनाच मोठेपण प्राप्त झाले हे निर्विवाद सत्य आहे. नुकताच त्यांना ‘अखिल भारतीय नाट्यपरिषदे’चा पुरस्कार प्राप्त झाला होता.
 
 
 
शेक्सपिअरने म्हटले आहे, ‘नावात काय आहे?’ सरांचे कागदोपत्री पाळण्यातील नाव ‘नवीनचंद्र’ आहे. सर मात्र ‘नवीन’ नावानेच सुपरिचित आहेत. सरांचा जन्म ‘नारळीपौर्णिमेचा/राखीपौर्णीमेचा.’ पौर्णिमेचा जन्म म्हणून नावातही चंद्र आला. कागदोपत्री सोडून मात्र तो परिचित राहिला नाही. मात्र, नावातील चंद्राची शीतलता त्यांचे वागण्यातून, बोलण्यातून सदैव डोकावत होती.
 
 
 
 
सर अत्यंत शांत. चिडणे, रागावणे त्यांना अवगत नव्हते. त्यांना चिडलेले, रागावलेले, संतापलेले कोणीच बघितलेले नाही. सदैव हसतमुख, दुसर्‍याला उत्साह देणारे, सदैव उत्साही असलेले. सदैव सुपरिचित असलेल्या ‘नवीन’ नावाप्रमाणेच ते नवनवीन प्रयोग संगीतात करीत होते. नवा उत्साह, नवा जोश, नवी उमेद, नव संकल्प, नवी प्रेरणा त्यांच्याजवळ शेवटपर्यंत होती.
 
 
 
अत्यंत शांत मनमिळावू व सदैव हसतमुख असलेले सर आज आपल्यात नाही. सर्वांना ते सदैव हवेहवेसे वाटत असत. आजही ही सर आपल्यात अजून असायला हवे होते असेच सर्वांना वाटते. सरांची उणीव सदैव जाणवत राहील. मी एक चांगला मार्गदर्शक व मित्र गमावला आहे. सरांचा परलोकाचा प्रवाहही संगीतमय असेल. तो सूरमय होत त्यांना सद्गती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना! सर अलविदा...




 
- शरद जाधव
@@AUTHORINFO_V1@@