व्यवहारात लवचिकता, विचारात दृढता यांचा सुरेंद्र थत्ते यांच्याशी ठायी संगम
मुंबई : “सुरेंद्र थत्ते यांचे जगणे म्हणजे उत्साहाचा सळसळता झरा होता. व्यवहारात लवचिकता आणि विचारात दृढता यांचा थत्ते यांच्या जीवनात संगम होता,” अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाह भैय्याजी जोशी यांनी सुरेंद्र थत्ते यांना श्रद्धांजली अर्पण केली.
रा. स्व. संघ महाराष्ट्र प्रांत माजी सहकार्यवाह कै. सुरेंद्र भास्कर थत्ते यांच्या निधनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोकण प्रांताच्या वतीने दादरच्या सानेगुरुजी विद्यालयात शनिवार, दि. १२ डिसेंबर रोजी झालेल्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. यावेळी ‘विज्ञान भारती’चे संघटन सचिव जयंत सहस्रबुद्धे, ‘हिंदुस्थान प्रकाशन’ संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, अॅड. बाळ देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
भैय्याजी जोशी म्हणाले की, “सुरेंद्र थत्ते यांच्यामुळे संघाच्या गीताला अर्थ प्राप्त झाला होता. संघ म्हणजे एक ग्रॅण्ड सर्कस आहे. त्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत. ही जीवनाची सर्कस आहे. त्यातील जीव म्हणजे सुरेंद्र थत्ते होते. थत्ते म्हणजे, ‘मॅन मेकिंग मशीन’ होते. त्यामुळेच संघाचे मिशन साध्य झाले. मनुष्य पडद्याआड गेला की सगळे संपते. पण, अनेकांनी त्यांच्या भावूक आठवणी जागवल्या हेच त्यांचे मोठेपण आहे. जन्माला आलेला मनुष्य केव्हातरी जायचा हे सत्य आहे. त्यामुळे त्यांचे जाणे धक्कादायक नसते, तर ते वेदनादायक असते. तसे थत्ते यांचे हसते-खेळते जीवन संपणे वेदनादायक होते. थत्ते यांनी संघाचे काम हसतखेळत; पण गंभीरपणे केले. त्यांचे जीवन अंतरबाह्य शुद्ध होते. त्यामुळे त्यांनी ध्येयासाठी कधीच तडजोड केली नाही. माणसे एका मुद्द्यावर झालेली मतभिन्नता जीवनाच्या सगळ्या पैलूंवर व्यक्त करतात आणि जीवन निरस करतात. पण, सुरेंद्र थत्ते यांनी मतभिन्नता मनाच्या पातळीवर येऊ दिली नाही, हेच त्यांचे असामान्यत्व होते. म्हणून ते कायम संघनिष्ठ होते,” अशा शब्दांत भैय्याजी जोशी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सतीश मोड, कनक त्रिवेदी, अनिल गचके, विमल केडिया, अॅड. बाळ देसाई, जयंतराव थत्ते, यांनीही सुरेंद्र थत्ते यांच्या आठवणी जागविल्या.
‘संघ सहकाऱ्यांना प्रेम अर्पण करतच सुरेंद्र थत्ते यांची जीवनज्योत मालवली’
यावेळी ‘हिंदुस्थान प्रकाशन’ संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे म्हणाले की, “संघ सहकाऱ्यांना प्रेम अर्पण करतच सुरेंद्र थत्ते यांची जीवनज्योत मालवली. सुरेंद्रचा आणि माझा स्वभाव म्हणजे दोन वेगवेगळी टोके होती. पण, भिन्न स्वभावाची माणसे एकदिलाने काम करतात, हीच संघकामाची खासियत आहे. कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्यात सुरेंद्रचा सिंहाचा वाटा असे. कार्यकर्ता म्हणून सगळ्या परिस्थितीत कसे राहिले पाहिजे, यासाठी सुरेंद्र आदर्श होते,” असे त्यांनी सांगितले.