देशात दुष्काळ असल्याने घेतला निर्णय
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दीर्घकाळापासून सुरू असलेला दुष्काळ आणि वाढलेल्या मानवी संघर्षामुळे आफ्रिकेतील नामीबिया सरकारने २०० हून अधिक हत्तींची विक्री करण्यासाठी जाहिरात काढली आहे. सरकारी मालकीच्या न्यू एरा वृत्तपत्राने जाहिरात काढून म्हटले आहे की, हत्तींसाठी आवश्यक असणाऱ्या अधिवासाची परिस्थिती बिघडल्याने आणि मानव-हत्ती संघर्ष वाढल्याने हत्तींना विकण्याची वेळ आली आहे.
नामीबियाने जवळजवळ चार वर्षांपासून दुष्काळाशी झुंज देत आहे. त्यामुळे येथे पाण्याची समस्या निर्माण झाली असून प्राण्यांना चरायला लागणाऱ्या जमिनी सुकल्या आहेत. राष्ट्रीय उद्यानांमधील पाण्याचे स्रोत कमी झाले आहेत. अन्न-पाण्याच्या शोधात हत्ती मानवी वस्तीजवळ भटकत आहेत. त्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत. गेल्या ३० वर्षांमध्ये नाबियातील हत्तींची संख्या वाढली आहे. १९९५ साली याठिकाणी ७ हजार ५०० हत्ती होते, तर २०१९ साली त्यांची संख्या २४ हजार झाली आहे. अशा परिस्थितीमुळे आता नामीबियन सरकारने हत्तींना विकण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचे म्हणणे आहे की, हत्तींच्या विक्रीमुळे त्यांची उपासमार थांबेल आणि मानवी जीवनाचा धोका कमी होईल. २०१८ मध्ये देशात सुमारे ६४ हजार जनावरांचा उपासमारीने मृत्यू झाला होता. नामीबियामध्ये जनावरांची निर्यात करण्यासाठी आणि शिकारीकरिता परवानगी आहे. २०१९ साली या देशात १,००० जनावरांची विक्री झाली आहे, तर यंदा १०० हून अधिक प्राणी विकण्यात आले आहेत.