नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांशी प्रकल्प मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनला पर्यावरण विभागांकडून हिरवा कंदील मिळाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या अखत्यारितील सर्व परवानग्या मिळाल्याने ५०८ कि. मीच्या बुलेट ट्रेनच्या कामाला गती मिळणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.के. यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वन्यजीव विभाग, जंगल विभाग आणि किनारी भूप्रदेश संबंधीत महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आत्तापर्यंत ६७ टक्के जमीन अधिग्रहीत करण्यात आली. गुजरातमधील ९५६ हेक्टरपैकी ८२५ हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आली असून एकून जमीनीच्या ८६ टक्के जमीन अधिग्रहीत झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यादव यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यातील ९७ टक्के जमीन अधिग्रहीत करण्यात आली असून फक्त ३ टक्के जमीन अधिग्रहण होण्याची बाकी आहे. गुजरातमधील प्रकल्पाच्या कामांसाठी ३२ हजार कोटींचे टेंडर काढल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. हा बुलेट प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ३५० किमी प्रतितास वेगाने ही बुलेट ट्रेन धावणार आहे. त्यामुळे अहमदाबाद ते मुंबई हे अंतर सुमारे दोन तासांत पार करता येणार आहे.